उल्हासनगरमध्ये नऊ वर्षांनी धावणार ‘परिवहन’

* जूनमध्ये धावणार 30 इलेक्ट्रिक बस
* नऊ वर्षांची प्रतिक्षा संपली
* दिव्यांगासाठी विशेष खूर्ची

उल्हासनगर : आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल नऊ वर्षांपासून बंद पडलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेची परिवहन सेवा सुरू होण्याचा मुहूर्त जूनमध्ये निश्चित झाला आहे. इका कंपनीच्या 30 इलेक्ट्रिक बस शहरात आणि शहराच्या बाहेर धावताना दिसणार आहेत. त्यात दिव्यांगासाठी विशेष खूर्चीची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे यांनी ही माहिती दिली.

2009 मध्ये परिवहन सेवेचे कंत्राट केस्ट्रल कंपनीचे राजा गेमनानी यांना देण्यात आले होते. मात्र सातत्याने होणारी डिझेल दरवाढ, खड्ड्यांमुळे बसेसमध्ये सातत्याने होणार बिघाड पाहता राजा गेमनानी यांनी 2013 पासून प्रवासी भाडेवाढ करून देण्याची मागणी केली होती. या मागणीला पालिकेने प्रतिसाद दिला नसल्याने शेवटी गेमनानी यांनी 2014 मध्ये परिवहन सेवेचा गाशा गुंडाळला होता.

त्यानंतर पालिकेने परिवहन सेवा सुरू करण्यासाठी अनेकदा निविदा प्रक्रिया हाताळल्या होत्या. पण त्या भरण्यास कोणतीही कंपनी पुढे येत नसल्याने 9 वर्षांपासून परिवहन सेवा ठप्प पडली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थी यांच्यावर रिक्षाने प्रवास करण्याची वेळ आली.

अखेर आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे यांनी परिवहन सेवेचा अभ्यास करून बसेस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी बोलणी केली. 45 कोटी रुपयातून 30 बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी निविदा प्रक्रिया हाताळल्यावर हैद्राबादमधील पिनॅकल कंपनीने निविदा भरली असून त्यास पालिकेने मंजूरी दिली आहे. ही कंपनी 12 वर्षाच्या करारावर परिवहन सेवा हाताळणार आहे. पुढच्या आठवड्यात या कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात येणार असून जूनच्या शेवटच्या आठवड्यात परिवहन सेवेच्या बसेस धावताना दिसणार आहेत.

30 सीटरच्या 15 आणि 54 सीटरच्या 15 अशा 30 बसेस धावणार आहेत. त्यात 15 सीटरच्या बसेस ह्या उल्हासनगर ते कल्याण, बदलापूरपर्यंत तर 30 सीटरच्या बसेस ह्या टिटवाळा, भिवंडी, नवीमुंबई अशा लांब अंतरावर धावणार असल्याची माहिती अशोक नाईकवाडे यांनी दिली.