20 इलेक्ट्रिक बससाठी मागवल्या निविदा
उल्हासनगर : शहरात परिवहन बससेवा पुन्हा सुरू होण्यासंबंधी मनपा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून 20 इलेक्ट्रिक बसगाड्यांसाठी निविदा मागविण्यात आल्याची माहिती मनपा उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली आहे.
उल्हासनगर शहरात कॅस्ट्रोल कंपनीमार्फत परिवहन सेवा सुरू होती. बससेवेसाठी आकारण्यात येणाऱ्या तिकिटांसाठी दरवाढ मिळावी, अशी मागणी कंपनी मालक राजा गेमनानी यांनी वारंवार केली होती मात्र प्रशासन आणि नगरसेवकांनी ती मागणी अमान्य केल्यानंतर अखेर कंपनीने बससेवा बंद केली. यानंतर मनपा प्रशासनाने दोन वेळा परिवहन सेवेसाठी निविदा काढल्या मात्र त्यास कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्याने ही परिवहन सेवा सुरू होऊ शकली नाही, परिवहन सेवा बंद असल्याने रिक्षाचालक अवाच्या सवा भाडे आकारणी करीत आहेत, त्यामुळे मजूर, कामगार, विद्यार्थी यांना रिक्षाभाडे परवडत नाही, त्यामुळे वारंवार परिवहन सेवा सुरू करा अशी मागणी नागरिक करीत आहेत.
तब्बल पावणेदोन वर्षानंतर इलेक्ट्रिक बससेवा सुरू होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. 20 इलेक्ट्रिक बसेस मनपाच्या ताफ्यात येणार असून त्यात मोठ्या आकाराच्या 10 बसेस अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, टिटवाळा, भिवंडी, नवी मुंबईपर्यंत धावणार असून अन्य 10 लहान बसेस शहरातील अंतर्गत भागात धावणार आहेत. बसडेपो, चार्जिंग स्टेशन आदींसाठी कंत्राटदाराला जागा मनपा प्रशासन देणार असून त्यात कंत्राटदारामार्फत सर्व्हिसिंग व इतर कामे करण्यात येणार आहेत. शहरातील विविध ठिकाणी बस थांबे बांधण्यात येणार आहेत तत्पूर्वी आम्ही 20 इलेक्ट्रिक बसेससाठी निविदा मागविल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. परिवहन सेवेचे तिकीट दर हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे असतील असेच आमचे प्रयत्न राहतील अशी माहिती यावेळी नाईकवाडे यांनी दिली. यावेळी उपायुक्त डॉ. सुभाष जाधव हे देखील उपस्थित होते.