राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित मंत्र्यांसह शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी सर्वच नऊ मंत्र्यांनी शरद पवार यांचे आशिर्वाद घेतल्याचे समजते.
विठ्ठला सांभाळून घे रे असे उद्गार काढत छगन भुजबळ शरद पवारांच्या पाया पडले. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी येऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटी दरम्यान जवळपास सर्वच मंत्र्यांनी शरद पवारांच्या पाया पडत हात जोडले. मंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचे समजते. अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखीलही तातडीने वाय.बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. मला सुप्रिया सुळेंचा फोन आला म्हणून मी लवकर निघालोय. शरद पवारांनी बोलवलंय, लवकर या असं मला सांगितलं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भेटीविषयी माहिती दिली. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “आम्हा सर्वांचे दैवत आदरणीय शरद पवार यांची आज भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतली. शरद पवार हे बैठकीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये असल्याचं समजलं. त्यामुळे वेळ न मागता आम्ही इथे आलो आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहिल याचाही विचार करुन त्यांनी येत्या काही दिवसात मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली. शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
अजित पवार गटाच्या नेत्यांनी एक तास शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, या भेटीत शरद पवार यांनी आमच्याशी काहीच भाष्य केलं नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
अजित पवार गट आजही शरद पवारांना आपला नेता मानतात. आपल्या ज्येष्ठ नेत्याकडे जाण्यात वावगं काही नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे.
आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम-जयंत पाटील
राष्ट्रवादी पक्षापासून वेगळी भूमिका घेऊन सरकारसोबत गेलेल्या नेत्यांनी शरद पवारांकडे या बैठकीत दिलगिरी व्यक्त केली. तसंच या सगळ्यातून पक्ष एकसंध राहावा, यासाठी मार्ग काढण्याची विनंती केलेली आहे. मात्र पवारसाहेबांनी या विनंतीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही,’ अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादीतील बंडखोर नेते शरद पवार यांना भेटल्याने आता संपूर्ण राष्ट्रवादी पक्षच सत्तेत सहभागी होणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘आम्ही याआधीच सरकारसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्या निर्णयावर सध्या ठाम आहोत. बंडखोर नेत्यांनी केलेल्या विनंतीवर काय उत्तर द्यायचं, हा आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रश्न आहे,’ अशा शब्दात पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे १९ ते २० आमदार आमच्यासोबत असल्याचा दावाही जयंत पाटलांनी केला आहे.