पालघरमध्ये ठाकूरांचा उमेदवार महायुतीच्या विरोधात रिंगणात

पालघर : बहुजन विकास आघाडीने पालघर लोकसभा निवडणुक लढवण्याचे निश्चित केले असून या निवडणुकीसाठी बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

विविध राजकीय व सामाजिक संस्थाच्या माध्यमातून सक्रिय असणाऱ्या राजेश पाटील यांच्या उमेदवारीमुळे पालघर लोकसभा निवडणुकीत रंगत आली आहे. सत्ताधारी पक्षाशी जुळवून घेण्याच्या आमदार हितेंद्र ठाकूर यांचे आतापर्यंतच्या राजकारणाचा बाज बघितल्यास सत्ताधारी पक्षाला कितपत अंगावर घेतात याची उत्सुकता आहे.

मुहूर्त साधून तसेच पक्षाचे पारंपारिक चिन्ह मिळवण्यासाठी अग्रक्रमाने उमेदवारी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. बहुजन विकास आघाडीतर्फे अजूनही काही उमेदवारांमार्फत अर्ज दाखल करण्यात येतील असा सूतोवाच करत आमदार हितेंद्र ठाकूर हेच आपले उमेदवार असल्याचे प्रतिपादन केले. माजी खासदार बळीराम जाधव यांच्या कार्यकाळात रेल्वे, घरोघरी नैसर्गिक वायू पुरवठा व इतर उपक्रम राबवून केलेल्या विकास कामांची आठवण करून दिली.

बहुजन विकास आघाडीकडे आरंभी पासून असणारे शिट्टी हे चिन्ह इतर पक्षाने यापूर्वी मागणी केल्याने एका निवडणुकीत त्यांना रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. त्यामुळे शिट्टी हे चिन्ह मिळवण्यासाठी अग्रक्रमाने हा अर्ज भरला गेला असल्याचे सांगण्यात आले. उमेदवारी अर्ज भरताना राजेश पाटील यांनी शिट्टी पाठोपाठ रिक्षा व लिफाफा अशा चिन्हांची पर्याय म्हणून मागणी केल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कडून सांगण्यात आले.

बहुजन विकास आघाडीने आपण निवडणूक लढवणार हे निवडणूक घोषित होण्याच्या काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांना आपण वेळोवेळी मदत केल्याचे सांगत या निवडणुकीत आपल्याला इतर पक्षांनी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा बहुजन विकास आघाडीकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर उमेदवारी जाहीर करण्याबाबत अनेकदा संकेत दिले गेले असले तरी अखेरपर्यंत उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती.

आज सकाळी ११ वाजल्यानंतर राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी आपली उमेदवारी अंतिम नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. या निवडणुकीत पक्षातर्फे अजूनही काहींची उमेदवारी भरली जाण्याचे संकेत देऊन नंतर उमेदवार निश्चिती करण्यात येईल असे राजेश पाटील यांनी सांगितले.

ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्यत्व (१९९७- २००२) उपभोगतांना ते शिक्षण समितीचे सदस्य राहिले. त्यानंतर २००२ ते २००५ या दरम्यान ते वसई पंचायत समितीचे सभापती होते. याच काळात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सदस्य तसेच ठाणे जिल्हा आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत राहिले आहेत. दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेडचे ते २००९ पासून आजतागत संचालकपदी निवडून आले असून महाराष्ट्र राज्य आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्थांचे संघाचे संचालक, पालघर जिल्हा हाउसिंग सोसायटी संघाचे संचालक तसेच इतर अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत.

सन २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून विजयश्री मिळवला होता. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपल्या मतदारसंघात प्रभावीपणे काम केले असून अनेक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा केला. त्याशिवाय स्थानीय पातळीवर त्यांनी प्रशासनाची मदत घेत विकास कामांमध्ये सक्रिय राहिले.