पालघर : केळवे येथे फिरायला गेलेल्या पाच पर्यटकांपैकी चार जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला असून एकाला बाहेर काढण्यात यश आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बेपत्ता असलेल्या दोघांना शोधण्यासाठी स्थानिक पर्यटक, व्यावसायिक आणि मच्छिमार समाजातील मंडळी युद्ध पातळीवर मदत करत आहेत.
ओम विसपुते (वय 17 वर्षे, रा. नाशिक, ब्रह्मा व्हॅली), अथर्व नाकरे (वय 13 वर्षे, रा. नाशिक, देवीपाडा), कृष्णा शेलार (वय 17 वर्षे, रा. नाशिक, ब्रह्मा व्हॅली), दीपक वडकाते (वय 17 वर्षे, रा. नाशिक, ब्रह्मा व्हॅली) अशी बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकांची नावे आहेत. तर अभिलेख देवरे ( वय 17 वर्षे, रा. नाशिक, ब्रह्मा व्हॅली) या पर्यटकाला बुडताना वाचवण्यात यश आले आहे. हे सर्व पर्यटक मुळचे नाशिक जिल्ह्यातील आहेत.
पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या केळवे येथील स्थानिक वास्तव्य करत असलेली दोन लहान मुले समुद्रात पोहायला उतरली होती. मात्र समुद्राला ओहोटी असल्याने ही मुलं बुडत आहेत असं लक्षात आले. नाशिक येथील ब्रम्हा व्हॅली स्कूलचा एक मोठा ग्रुप केळवे येथे पर्यटन स्थळी मौजमजा करण्यासाठी आला होता. या सर्वांना ही लहान मुलं बोलवत आहेत असे लक्षात आल्याने यापैकी चौघांनी समुद्रात उड्या मारल्या व त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये केळवे येथील स्थानिक रहिवासी असलेली दोन्ही मुले व त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एक जण सुखरूप असून बुडाल्यापैकी दोघे जण बेपत्ता असलेल्यांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी स्थानिक व्यवसायिक आणि स्थानिक मच्छिमार मंडळी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिसांची फौज पोहोचली असून शोधकार्य सुरू आहे.