मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसात की रखडणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द

मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नव्या सरकारमध्ये शपथ घेऊन आज जवळपास 25 दिवस उलटले. मात्र अजूनही नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडलेला नाही. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे अवघं राज्य आणि सर्व आमदार डोळे लावून बसले आहेत. हा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारच्या विस्ताराला अखेर शुक्रवारी म्हणजे 29 जुलैचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. आज रात्री ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मंत्रिमंडळाची यादी निश्चित होऊन शुक्रवारी विस्तार केला जाईल, अशी चर्चा आहे. मात्र दिल्ली दौरा रद्द झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई आणि अब्दुल सत्तार यांना संधी मिळू शकते.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून नव्या सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होतं परंतु चार आठवडे झाले तरी विस्तार होत नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी अडचण काय? असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. आता दिल्लीवारी झाल्यानंतर तरी मंत्रिमंडळ विस्तार होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.