राज्यकर्त्यांचा कारभार तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची टीका
ठाणे : शाईफेक प्रकरणाचे समर्थन होऊ शकत नाही पण, या गुन्ह्यात लावण्यात आलेले ३०७ कलमाचेही समर्थन होऊ शकत नाही, असे मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केले.
आपले विचार आणि लोकांसाठी आंदोलन करणे हे राजकीय जीवनाचा भाग असतो. पण अशी आंदोलने करणाऱ्या तरुणांचे आयुष्य उध्वस्त करण्याच्या दिशेने राज्यकर्त्यांचा कारभार सुरु आहे. त्यामुळे ३०७ कलम लावण्यात आलेल्या तरुणाच्या मागे राष्ट्रवादी पक्षाने ठाम उभे राहायला हवे, अशी मागणीही त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे यावेळी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आभासी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी शरद पवार हे मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथून व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे उपस्थित होते. या सभेत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला. आंदोलन करणे राजकीय जीवनाचा भाग आहे. मी आंदोलने केली नसती तर कदाचित मी तुमच्या नजरेसमोर आलो नसतो. तरुण कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतात. आपल्या विचारांसाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी रस्त्यावर उतरणे हे आम्ही शरद पवार यांच्याकडून शकलो असून यामुळेच राज्यकर्त्यांनी 307 कलम लावलेल्या तरुणांच्या पाठीमागे आपल्या पक्षाने ठाम उभे राहावे, अशी मागणी आव्हाड यांनी यावेळी केली.
एक महिला संसार चालवू शकते तर ती राज्य आणि देशही चालू शकते, हे शरद पवार यांचे मत आहे, असे मला वाटते. महिलांना मुख्य प्रवाहात सामील केल्याशिवाय समाज पुढे जाऊ शकत नाही, हे महात्मा फुलेंनी सांगितले. त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकर ही विचारधारा जिवंत ठेवण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते शरद पवार आहेत, असेही आव्हाड म्हणाले.