मुंबईसह ठाणे जिल्हा आणि संपूर्ण कोकण विभागात सोमवारपासून सर्वत्र सुरु असणाऱ्या मुसळधार पाऊसाचा जोर येत्या काही दिवसांमध्ये अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवार दुपारपासूनच या भागामध्ये पवासाचा जोर सुरु असून मंगळवारी सकाळीही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. सोमवारीच मुंबई, ठाण्यासहीत कोकणामधील काही भागांतील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पहायला मिळालं. देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलीय.
हवामानतज्ज्ञ आणि हवामानखात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवरुन भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात ढग जमा झाल्याची माहिती दिलीय. होसाळीकर यांनी पश्चिम किनारपट्टीचे उपग्रहांच्या माध्यमातून काढलेला फोटोही शेअर केला आहे. या फोटोसोबत होसाळीकर यांनी किनारपट्टीबरोबरच मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केलीय.
भारतीय हवामान खात्याने येत्या चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार तर संपूर्ण महाराष्ट्रात साधारण पावसाची वर्तवली आहे. सध्या मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरी बरसत आहेत. हीच स्थिती पुढील काही दिवस काय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह चाकरमान्यांनी योग्य ती खरबदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.