मुंबई : राज्यात भोंग्यांच्या विरोधात भूमिका मांडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. बाळा नांदगावकर यांनी मुंबईत ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा दिला आहे.
राज ठाकरे यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आले असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे. राज्य आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे. बाळा नांदगावकर यांनी आज सकाळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी नेमकी काय चर्चा केली होती याची माहिती दिली नव्हती. भेटीनंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीचे कारण उघड केले आणि राज ठाकरेंना धमकी मिळाली असल्याची माहिती दिली.
“मला एक धमकीचं पत्र आलं आहे. भोंग्याचा विषय समोर आल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहे. पत्रात माझ्यासोबत राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी राज ठाकरेंना पत्र दाखवलं आणि काल संध्याकाळी पोलीस आयुक्तांना भेटलो. पत्राची प्रत त्यांना दिली आहे. पोलीस काय कारवाई करतात ते पाहू,” असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
तसेच “पत्र कोणी दिलंय याची माहिती नाही. पण ते पोस्टातून माझ्या कार्यालयात आले आहे. गृहमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी ताबडतबोत पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. पण मी एवढंच सांगू इच्छितो की, बाळा नांदगावकर ठीक आहे पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही याची दखल राज्य सरकारने घ्यावी. मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी”. असेही बाळा नांदगावकर यांनी यावेळी म्हटले आहे.