जिल्हा
हाऊसिंग बोर्डमधील रहिवाशांचा वनवास संपेना!
हाऊसिंग बोर्डमधील रहिवाशांचा वनवास संपेना!
फोटो: ठाणे वैभव
१४ वर्षांपासून पुनर्विकास रखडल्याने १९२ कुटुंबे बेघर
अंबरनाथ: गेल्या १४ वर्षांपासून इमारतीचा पुर्नविकास रखडल्याने रखडल्याने बेघर झालेल्या संतप्त रहिवाशांनी माजी उप नगराध्यक्ष, विद्यमान शिवसेना नगरसेवक अब्दुल शेख यांच्या नेतृत्वाखाली आज भर पावसात तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून न्याय देण्याची मागणी केली.
अंबरनाथच्या पश्चिम भागातील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड वसाहतीतील श्यामराव पाटील नगर इमारत क्रमांक आठ ते १३ या सहा इमारतींचा पुनर्विकास प्रकल्प गेल्या १४ वर्षांपासून आहे.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पात १९२ कुटुंबांचा समावेश असून विकासकाने करारानुसार पुनर्विकास पूर्ण केलेला नाही. तसेच जून २०१९ पासून रहिवाशांना घरभाडेही देण्यात आलेले नसल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेकांना भाड्याच्या घरात राहण्यासाठी कसरत करावी लागत असून काही कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात यापूर्वी विविध शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधी तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेही वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
नगरसेवक शेख यांच्या उपस्थितीत रहिवाशांनी तहसीलदारांना निवेदन दिले. संबंधित विकासकाची तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, जून २०१९ पासूनची थकीत भाड्याची रक्कम व्याजासह मिळावी, पुनर्विकासासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, विकासक असमर्थ ठरल्यास त्याची नियुक्ती रद्द करून सक्षम विकासकाची नेमणूक करावी, तसेच दोषी अधिकारी आणि विकासकांवर कारवाई करून पुनर्विकास पूर्ण होईपर्यंत रहिवाशांना नियमित भाडे मिळण्याची शासनाने हमी द्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
हाऊसिंग बोर्डामधील १९२ कुटुंबीयांपैकी ११२ घरे तयार झाली ती रहिवाशांना देण्यात यावी यासाठी वारंवार प्रयत्न केले मात्र अद्याप रहिवाशांना घरे मिळाली नाहीत. म्हाडाचे अधिकारी तक्रारींची दखल घेत नाहीत. तेथील रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरे मिळावीत आणि दोषी विकासकावर शासनाने कारवाई करावी या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयामार्फत शासनाला निवेदन देण्यात आल्याची माहिती नगरसेवक शेख यांनी दिली.
300x450
300x600