अन्य
लाचेची मागणी करणाऱ्या महिला सरपंचासह पतीविरोधात गुन्हा
लाचेची मागणी करणाऱ्या महिला सरपंचासह पतीविरोधात गुन्हा
फोटो: ठाणे वैभव
भिवंडी : तालुक्यातील दिवे-अंजुर ग्रामपंचायत हद्दीत जाहिरात होर्डिंग लावणाऱ्या कंपनीकडून दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिला सरपंचासह तिचा पती आणि ग्रामपंचायत सदस्य अशा तिन विरोधात गुरुवारी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दिवे अंजुर ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा पाटील, सदस्य आकाश म्हात्रे आणि सरपंच महिलेचा पती सदानंद पाटील असे लाच प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांनी आपसात संगनमत करून याच गावातील ए.के.अँड कंपनीचे मालक अरुणकुमार पाटील यांच्या मालकीच्या जागेत मेसर्स आय टच पब्लिसिटी कंपनीने जाहिरात होर्डिंग लावण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ना हरकत दाखल्याची मागणी केली होती. ना हरकत दाखल देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा पाटील यांनी कंपनीत काम करणारे राहुल किसन म्हात्रे यांच्याकडे २८ जुलै रोजी दीड लाख रुपयांची मागणी केली होती.
या रक्कमेत ग्रामपंचायत सदस्य आकाश म्हात्रे यांनी २५ हजार कमी करत एक लाख २५ हजार रक्कम ठरवून लाचेची मागणी केली. ही रक्कम ग्रामपंचायत सदस्य आकाश यांच्याकडे देण्याचे सरपंच रेश्मा पाटील यांचे पती सदानंद पाटील यांनी सांगितले होते. त्यांनतर महिला सरपंचाने ही रक्कम घरी घेऊन ये, असे सांगितले होते.
याप्रकरणी राहुल म्हात्रे यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक माधवी राज कुंभार यांनी घटनास्थळी भेट देत म्हात्रे यांच्या फिर्यादीवरून नारपोली पोलीस ठाण्यात महिला सरपंच, सदस्य आणि सरपंच महिलेचे पती अशा तिघां विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान तीनही आरोपी गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागल्यानंतर फरार झाले आहेत. या घटनेने दिवे-अंजूर परिसरात खळबळ माजली आहे.
300x450
300x600