जिल्हा
मारुती धबधबा दुर्घटनेत रब्बानी शेख व परसू पोकळा ठरले देवदूत
मारुती धबधबा दुर्घटनेत रब्बानी शेख व परसू पोकळा ठरले देवदूत
फोटो: ठाणे वैभव
शहापूर : शहापूर तालुक्यातील चोंढे येथील मारुती धबधबा परिसरात रविवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या कल्याणातील पाच पर्यटकांपैकी तिघांना वाचवण्यात रेस्क्यु टीमला यश आले.
पाण्याच्या प्रवाहात अडकून आकाश देशमुख (२९) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दिनेश मांडलकर (३४) हे बेपत्ता झाले होते. सोमवारी सकाळपासून सुरू करण्यात आलेल्या अथक शोध मोहिमेनंतर दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास साकुर्ली-वेळोशी फाटा परिसरात त्यांचा मृतदेह सापडला. या दुर्घटनेत प्रसाद इंगळे, नितेश पाटील आणि अजय मुरकुटे तिघेही राहणार कल्याण यांचा सुखरूप बचाव करण्यात आला. या प्रसंगी स्थानिक युवक रब्बानी शेख आणि चोंढे बनाचीवाडी येथील परसू पोकळा या तरुणांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी धाव घेत प्राण वाचविण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दरम्यान, बेपत्ता व्यक्तीच्या शोधासाठी शहापूर येथील जीवरक्षक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सोमवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून टीमने दुर्गम डोंगररांगा, दाट जंगल, काटेरी झुडपे आणि वेगवान पाण्याच्या प्रवाहातून तब्बल चार ते पाच किलोमीटर परिसर पिंजून काढला. अनेक ठिकाणी नदीत उतरून प्रत्येक भागाची बारकाईने तपासणी करण्यात आली.सलग अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर दुपारी सुमारे १२ वाजता साकुर्ली- वेळोशी फाटा परिसरात बेपत्ता दिनेश मांडलकर यांचा मृतदेह शोधण्यात टीमला यश आले.
या शोध मोहिमेत समीर चौधरी, रविंद्र मडके, रमेश डिंगोरे, गजानन शिंगोले, भरत शेरे, प्रतीक उमवणे, अतुल अंदाडे, गणेश शिंदे, कैलास शेळके, स्वागत विशे आणि राजेंद्र सापळे यांनी जीवाची पर्वा न करता सहभाग नोंदवला. कठीण परिस्थितीत दाखवलेले धैर्य, चिकाटी आणि मानवतेची भावना यामुळे या सर्व सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
300x450
300x600