जिल्हा
बारवी धरण ७६ टक्के भरले
बारवी धरण ७६ टक्के भरले
फोटो: ठाणे वैभव
बदलापूर: जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत असून रविवारी बारवी धरणाचा पाणीसाठा ७३ टक्के होता. तर सोमवारी धरणात थेट तीन टक्क्यांची भर पडून बारवी धरण ७६.४० टक्क्यांवर पोहोचले.
संपूर्ण जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाने जोर धरला. ठाणे (५६.० मिमी) व मुरबाड (५२.० मिमी) तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट पूर्णपणे मिटल्याचे चित्र आहे. काही धरणे पूर्ण भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील मोडक सागर धरणाने आपली शंभर टक्के पाणीपातळी गाठली असून ते पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणातून सध्या सेकंदागणिक १८७.७८ घनफूट (क्युसेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मुंबई व ठाण्याची तहान भागवणाऱ्या तानसा धरणानेही ९८.९३ टक्क्यांचा टप्पा ओलांडला असून ते पूर्ण भरून वाहण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे. या धरणातूनही १३८.४४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. शहापूर तालुक्यातील भातसा धरणात ८९.९९ टक्के पाणीसाठा जमा झाला असून तेथूनही ११७.९०५ क्युमेक्स पाणी सोडले जात आहे. शिवाय, अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरणाच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ कायम असून हा साठा आता ७६.४० टक्क्यांवर पोहोचला आहे.
उल्हास नदी बदलापूरमध्ये १४.१० मीटरवर वाहत होती, ती तिच्या १६.५० मीटर या इशारा पातळीपेक्षा बरीच खाली होती. तसेच, जांभूळपाडा येथे ११.८० मीटर व मोहने येथे ६.८० मीटर पातळीवरून उल्हास नदी वाहत होती. कल्याणजवळील टिटवाळा येथे काळू नदी १००.८० मीटरवर वाहत होती.
300x450
300x600