जिल्हा
मीरा-भाईंदर विकास आराखड्याला मंजुरी
मीरा-भाईंदर विकास आराखड्याला मंजुरी
फोटो: ठाणे वैभव
शहराच्या शाश्वत विकासाचा मार्ग मोकळा
भाईंदर : मीरा-भाईंदर शहराच्या आगामी २० वर्षांतील नियोजित आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा नविन विकास आराखडा महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. या मंजुरीमुळे शहराच्या पायाभूत सुविधा, रस्ते रुंदीकरण, उद्याने आणि सार्वजनिक आरक्षणांचा मार्ग मोकळा झाला आहे.
मीरा-भाईंदर शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि नागरीकरण लक्षात घेता, जुना विकास आराखडा कालबाह्य ठरत होता. त्यामुळे नव्या विकास आराखड्याकडे संपूर्ण शहरवासीयांचे डोळे लागले होते. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत प्रशासनाने तयार केलेला प्रारूप विकास आराखडा मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला. सभेत लोकप्रतिनिधींनी शहरातील विविध भागांतील आरक्षणे, रस्ते आणि खेळाच्या मैदानांच्या जागांवरून सखोल चर्चा केली. काही सुधारणा आणि सूचनांसह अखेर या विकास आराखड्याला सभागृहाने मंजुरी दिली.
मंजूर विकास आराखड्यातवाढत्या वाहतुकीचा विचार करता नवीन डीपीमध्ये अंतर्गत मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण आणि नवीन उड्डाणपुलांचे नियोजन करण्यात आले आहे. शाळा, रुग्णालये, अग्निशामक दल, आणि कचरा व्यवस्थापन प्रकल्पांसाठी पुरेशा जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. शहराचे फुफ्फुस मानल्या जाणाऱ्या मैदानांचे, उद्यानांचे आणि मँग्रोव्हज क्षेत्राचे संरक्षण करत 'ग्रीन झोन' संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.आगामी मेट्रो ९ मार्गिका आणि इतर प्रादेशिक वाहतूक प्रकल्पांना पूरक ठरेल अशी रचना अंतर्गत रस्त्यांच्या जाळ्यात करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या विशेष सभेत हा आराखडा मंजूर झाल्यानंतर,
त्यासंदर्भात त्यानंतर नागरिकांच्या हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याने शहरातील विकास आराखड्यावरील हा सर्वात मोठा बदल मानला जात आहे.
त्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठवला जाईल. शासनाकडून अंतिम मंजुरी आणि राजपत्रात प्रसिद्धी झाल्यानंतर या आराखड्याची शहरात अधिकृत अंमलबजावणी सुरू होईल.
300x450
300x600