पहलगाम हल्ला: हजारो लोक रस्त्यावर
ठाणे: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा परिसरात विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले. काळे झेंडे दाखवित; पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत हजारो मुंब्रावासियांनी रस्त्यावर उतरून दहशतवादी कृत्याचा निषेध केला.
काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शमीम खान आणि शानु पठाण यांच्या आवाहनानुसार हजारो मुंब्रावासियांनी रस्त्यावर उतरून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. जुम्माचा नमाज अदा केल्यानंतर हजारो लोक सुरूवातीला कौसा जामा मशिदीबाहेर जमा झाले. तिथे निदर्शने केल्यानंतर रिझवी बाग मस्जिद, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय, तनवीर नगर येथे आंदोलन केले. या प्रसंगी शमीम खान यांनी रास्ता रोकोदेखील केला. तसेच, रशीद कंपाउंड येथेही नागरिकांनी पाकिस्तानचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी, पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद को जड से मिटाओ, हमारी जान… हिंदुस्थान अशा घोषणा दिल्या.
या प्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी, पहलगाम येथील हत्याकांडास जेवढे दहशतवादी जबाबदार आहेत. तेवढेच जबाबदार केंद्र सरकारही आहे. अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था डळमळीत का होती? येथील लष्कराचे जवान कुठे होते?, असा सवाल डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.