गायरान जागेवरील निवासी धारकांना दिलेल्या नोटिसा मागे घ्या 

अंबरनाथ तहसील कार्यालयावर श्रमजीवींचा मोर्चा

अंबरनाथ : गायरान आणि शासकीय जागेवरील निवासी धारकांना बजावण्यात आलेल्या नोटीसामागे घ्याव्यात या मागणीसाठी  शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी श्रमजीवी संघटनेमार्फत अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला होता.

श्रमजीवी संघटनेचे राज्य सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके आणि राजेश चन्ने, तालुका अध्यक्ष राजेंद्र म्हस्कळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्च्यात मोठ्या संख्यने नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

शासकीय आणि गायरान जमिनीवर राहणाऱ्या झोपडी अथवा घर धारकांना त्यांच्या घराखालील जागा नावावर करून सनद वाटप करावी, सर्व आदिवासी कुटुंबाना घरकुल योजनेमध्ये समाविष्ट करावे, सर्व आदिवासी कुटुंबाना मोफत वीज  मीटर द्यावेत, त्यांना घरकुल योजना आणि आधारकार्ड उपलब्ध करून द्यावीत, आदिवासी कुटुंबांची वस्तीस्थाने निश्चित करून त्यांना पट्टे वाटप करावे, पिण्याच्या पाण्याची गैरसोय असणाऱ्या वस्त्यांना पाण्याची व्यवस्था करून द्यावी, त्याचप्रमाणे देवळोली, सावरे, शिरवली, ढवळेगाव देवीचा पाडा शेकरपाडा याठिकाणी अंतर्गत रस्ते आणि स्वच्छतागृहे द्यावीत या आणि अन्य मागण्यांसंदर्भात न्याय मिळावा या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने आज गुरुवार १ डिसेम्बर रोजी तहसीलदार कार्यालयावर  मोर्चा आणून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

नायब तहसीलदार बंडू जाधव यांची  शिष्टमंडळाने भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले आणि चर्चा केली. १४ डिसेम्बर रोजी याबाबत  संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सविस्तर चर्चा करण्यासाठी प्रशासनाने बोलावल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.