उष्माघाताचा धोका वाढणार? सिव्हिल रुग्णालय झाले सावध!

२० रुग्णशय्यांचा वातानुकूलित कक्ष

ठाणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून ठाणे शहराचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढले असल्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. तरीही उष्माघात रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालयात २० खाटांचा विशेष वातानुकूलित कक्ष तैनात ठेवण्यात आला आहे.

या कक्षात सर्व यंत्रणा सुसज्ज असून, उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडताना टोपी, छत्री, पाणी, गॉगल सुती कपड्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केली आहे. नऊ महिन्यांपूर्वी सिव्हील रुग्णालय पाडून या जागेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधले जात आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय न होण्यासाठी वागळे इस्टेट मनोरुग्णालयाशेजारी आरोग्य विभागाच्या जागेत तात्पुरते सिव्हील रुग्णालय उभारले आहे. जेणेकरुन, रुग्णांना चांगले उपचार देण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न असून, दररोज सुमारे ५०० ते ६०० रुग्ण उपचारासाठी येत असतात.

ठाणे जिल्ह्याचे तापमान ४० अंशावर पोहोचले असून, वाढत्या तापमानाचा त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे. कोणालाही उष्माघाताचा त्रास झाल्यास सिव्हिल रुग्णालय सज्ज झाले आहे. रुग्णालयात २० खाटांचा वातानुकूलित विशेष कक्ष निर्माण केला आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

उष्णतेची लाट आणखी काही दिवस राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगितले आहे. उकाडा वाढल्यामुळे थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था आदी लक्षणे अशाप्रसंगी आढळतात.

महत्वाचे काम असल्यास दुपारच्या उन्हात बाहेर पडावे. उन्हाळ्यात बरेच पाणी प्यावे, हलके, पातळ सूती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बुट व चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करणा-या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक आदींचा नियमित वापर करावा. उष्माघात रुग्णांची संख्या वाढल्यास त्या प्रमाणे खाटा वाढवण्यात येतील, असे डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.