मलंगगड मुक्ती झाल्याशिवाय गप्प बसणार नाही – मुख्यमंत्री

* राज्यस्तरीय श्री मलंगगड अखंड हरिनाम सप्ताह सुरू
* एकनाथ शिंदे रंगले रिंगण सोहळ्यात

कल्याण : काही गोष्टी आपण जाहीरपणे सांगू शकत नाही, मात्र आपल्या सर्वांच्या मनात असणारी मलंगगड मुक्तीची भावना पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी दिली.

ठाणे-रायगड जिल्ह्यातील वारकरी आणि भागवत संप्रदायांतर्फे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने श्री मलंगगडाच्या पायथ्याशी आयोजित राज्यस्तरीय श्री मलंगगड अखंड हरिनाम सप्ताहाची सुरूवात झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

सकाळपासूनच राज्यभरातील वारकऱ्यांची पाऊले मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील उसाटणेजवळ वळत होती. सकाळपासूनच तरूण, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह लहानग्या वारकऱ्यांनीही पारंपरिक वेशभुषेत कार्यक्रमस्थळी जमत होते. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या दिंडीला सुरूवात झाली. या दिंडीमध्ये विठ्ठल रखुमाई, श्री नवनाथ, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आदींच्या वेशभूषा करून आलेले वैष्णव बांधव उपस्थित होते. तर स्थानिक ग्रामस्थही पारंपरिक वेश परिधान करून टाळ मृदंग, ढोल ताशा, लेझीम पथकासह सहभागी झाले होते. याच दिंडीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला. टाळ आणि हरिनामाचा गजर करत त्यांनीही दिंडीमध्ये सहभागी होत वारकऱ्यांचा उत्साह वाढवला. यावेळी हरिनाम सप्ताहाचे स्वागतोत्सुक आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही दिंडीत सहभाग घेतला.

या हरिनाम सप्ताहातील उद्घाटन समारंभात मुख्य आकर्षण ठरला तो भव्य असा रिंगण सोहळा. अक्षरशः पंढरपूरप्रमाणे साजऱ्या झालेल्या या रिंगण सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाती टाळ घेत भान हरपून सहभागी झाल्याचे दिसून आले. यावेळी हेलिकॉप्टरमधून रिंगण सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना या रिंगण सोहळ्यात भागवत धर्माची पताका घेऊन रिंगण सोहळ्यातील ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वापुढे धावण्याचा मान मिळाला.

यावेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. अशा प्रकारचे हरिनाम सप्ताह ही काळाची गरज बनली आहे. अशा सप्ताहांची परंपरा ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या सोहळ्याचा समृद्ध वारसा पाहता राजकीय अधिष्ठानापेक्षा अध्यात्मिक अधिष्ठान हे सर्वोच्च असल्याची भावना आपल्या मनात असून जगण्यासाठी माणसाच्या मनात श्रद्धेचा दुवा असला पाहिजे असे मतही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

या राज्यस्तरीय हरिनाम सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, विश्वनाथ वारींगे महाराज, चेतन महाराज, दिगंबर शिवनारायण जी, विष्णूदादा मंगरुळकर, संतोष चांगो देशेकर, गोपाळ जी, शंकर गायकर, दिनेश देशमुख यांच्यासह अनेक साधू महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.