भिवंडीत भीषण आगीत तीन कंपन्यांचे गोदाम जळून खाक

ठाणे : जिल्ह्यात सतत लागणाऱ्या आगीच्या दुर्घटनांमुळे ज्वालामुखीचा तालुका म्हणून ओळख निर्माण झालेल्या भिवंडीत तालुक्यात अग्नीतांडवाचे सत्र सुरुच आहे. आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत तीन गोदामे जळून खाक झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्ग लगत असलेल्या येवई गावच्या हद्दीत आर.के.लॉजिस्टीक गोदाम संकुलात बॅकारोझ परफ्युमस अँड ब्युटी प्रॉडक्टस् प्रा ली , इन्टरक्राफ्ट ट्रेडिंग प्रा. लि, फ्रेगरेंस शॉप प्रा. लि या तीन कंपन्यांचे गोदाम आहेत. या गोदामात मोठ्या प्रमाणात परफ्यूमचा साठा साठवून करून ठेवला होता. त्यातच (१९ फेब्रुवारी) आज पहाटे चार वाजल्याच्या सुमारास अचानक एका गोदामाला आग लागली. काही क्षणात आगीनं रौद्ररूप धारण केले. ही आग पसरत जवळच्या गोदामांना लागली. या आगीच्या कचाट्यात सापडल्याने तीन कंपन्यांचे गोदाम जळून खाक झाले आहेत. अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण-डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांसह पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहचले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केले. परफ्युमच्या साठ्यामुळं आग अधिकच भडकत होती. सध्या, घटनास्थळी कुलींगचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेश पवार यांनी दिली आहे. ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे सात तास लागल्याची माहितीही त्यांनी दिली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. आग लागण्याचं नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.