पॅनेलमध्ये मतदार वाढणार, नगरसेवक कमी होणार?

आजपासून प्रभाग रचनेचा श्रीगणेशा!

ठाणे : ठाणे महापालिका प्रशासन उद्यापासून आगामी निवडणुकीच्या प्रभाग रचनेच्या कामाचा श्रीगणेशा करणार असून २०१७ च्या पॅटर्ननुसार चार सदस्य पॅनलपद्धतीने ठाणे महापालिकेची आगामी निवडणूक पार पडणार आहे. पुढील महिन्यात २२ जुलैपर्यंत ही प्रारुप प्रभाग रचना तर ४ सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

मागिल तीन वर्षे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरु असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात येणार आहे. २०१७च्या प्रमाणे ही निवडणूक होणार असून चार महिन्यात निवडणूक घ्यावी लागणार असल्याने राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निश्चित केलेल्या प्रभागात कोणता नवीन परिसर समाविष्ट होणार आणि कोणता वगळला जाणार याची उत्सुकता माजी नगरसेवकांसह इच्छूकांना लागली आहे. पण प्रभाग रचना करताना त्रिसदस्य पद्धतीमुळे वाढलेले प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या कमी होण्याचे संकेत आहेत.

प्रशासकाच्या हाती असलेल्या ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून पुन्हा पाऊल ठेवण्यासाठी माजी नगरसेवकांसह इच्छूक उमेदवार डोळे लावून बसले आहेत. त्यांची ही प्रतीक्षा अखेर संपणार असून यावर्षीच्या अखेरपर्यंत निवडणुकीचा बार उडणार आहे. त्यादृष्टीने मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीचा प्राथमिक कार्यक्रम जाहिर झाला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेवरून प्रभागांचा प्रारुप आराखडा तयार करण्याचे काम ठाणे महापालिका हाती घेणार आहे. प्रारुप प्रभाग रचना तयार करताना जनगणनेची प्राप्त माहिती तपासून प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करण्यात येणार आहे. गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रभागाच्या हद्दी जागेवर जाऊन तपासल्यानंतर प्रारुप प्रभाग रचना हरकती, सुचनांसाठी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. यासाठी १७ जून ते २२ जुलैपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चार सदस्य पॅनलचे प्रभाग तयार करताना किमान ४० ते ४५ हजार लोकसंख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे २०१७ मध्ये ज्या पद्धतीने प्रभाग रचना होती त्यामध्ये किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे. त्यावेळी चार सदस्यांंचे ३२ आणि तीन सदस्यांचा एक असे ३३ प्रभाग होते. प्रभागांची सुरुवात घोडबंदर मार्गावरील गायमुख येथून तर शेवटचा प्रभाग हा दिव्यातील तीन पॅनलचा होता. त्याच पद्धतीने यावेळी प्रभाग रचनेचे सोपस्कार पार पडणार असल्याचे समजते.

प्रत्येक पॅनलमध्ये मतदार वाढण्याची शक्यता ग्राह्य धरून प्रभाग रचना उत्तरेकडून इशान्य त्यानंतर पूर्व दिशेकडून पश्चिमेकडून सरकत तयार करण्याची सुचना देण्यात आली आहे. त्यामुळे प्रभागाचे क्रमांक बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हरकती सुचनांसाठी नऊ दिवस

२२ जुलैपर्यंत प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचे निर्देेश आहेत. त्यानंतर हरकती सुचना करण्यासाठी नऊ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. ३१ जुलैपर्यंत हरकती, सुचना मांडण्याची मुदत असून त्यांनतर ११ ऑगस्टपर्यंत त्यावर होणार आहे. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकार्‍यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना १८ ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होऊन अंतिम प्रभाग रचना ४ सप्टेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.