उन्हाळी भातशेतीसह भाजीपाला भुईसपाट

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

शहापूर : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून या सतत पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी भातशेती तसेच भाजीपाला शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करुन त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी भाजपच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक इरनक यांनी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

चेरपोली, आवरे, कांबरे, कवडास, तुते, अर्जुनली, पिंपळपाडा, काळेपाडा, सरलांबे, साजिवली, सावरशेत, खुटाडी या गावांमधील शेतक-यांची शेतजमीन ओलिताखाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी भातसा धरणातून सोडण्यात येणार्‍या कालव्याच्या साह्याने पाणीपुरवठा करून अनेक वर्षांपासून उन्हाळी भातशेती करीत आहेत. दरम्यान भातसा धरण विभागाला विनंती करूनही कालव्यात पाणी सोडण्यात न आल्याने भातशेती व भाजीपाला शेतीचे नुकसान झाले आहे.

भातपीक उत्तम प्रकारे आले असून कापणीसाठी तयार झाले आहे. परंतु गेल्या २० दिवसांपासून सतत पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे भात कापणीसाठी विलंब होत आहे. यामुळे तयार झालेले उभे पीक सततच्या पावसामुळे आडवे झाल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.