खवय्यांची ठाणे, कळवा मासळी बाजारात झुंबड
ठाणे : अवकाळी पावसाने यावर्षी हजेरी लावली असून यावेळी मान्सून देखील लवकरच हजेरी लावणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीसाठी खवय्यांची पावले ठाणे व कळवा येथील मासळी बाजाराकडे वळल्याचे चित्र दिसत आहे.
पावसाळ्यात दरवर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत खोल समुद्रातील मासेमारीला बंदी असते. नदी तसेच खाडीमधील मासे पावसाळ्यात विक्रीसाठी येत असले तरी त्याचे दर आवाक्याबाहेर असतात. यंदा मे महिन्यातच पावसाचा जोर वाढला असून सुकट, मांदेली, बारीक जवळा, माखली, सोडे, बोंबील, बांगडे यांसारखी सुकी मासळी बाजारामध्ये विक्रीकरिता दाखल झाली आहे. त्यामुळे खरेदीसाठी महिलांची लगबग सुरु झाली आहे.
ठाण्यातील मार्केट परिसरामध्ये खारबाव, उत्तन, भिवंडी, वसई, पनवेल यांसारख्या भागातून सुकी मासळी घेऊन महिला येऊ लागल्या आहेत. सध्या आवक कमी होत असल्याने 100 ते 150 रुपये वाटाप्रमाणे जवळा आणि करंदीची विक्री सुरू आहे. लहान-मोठ्या आकारातील बोंबील 350 ते 400 रुपय किलो, सोडे 350 ते 400 रुपये किलो, मांदेली 200 रुपये वाटा विकली जात आहे. मात्र दर वाढले असले तरी खवय्यांची गर्दी वाढतच असल्याचे पाहायला मिळत आहे.