दुचाकी, मोबाइल चोर त्रिकुटाला अटक

भाईंदर : दुचाकी, मोबाइल चोरीसह जबरी चोरी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला मीरा रोडच्या नयानगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत, तर या टोळीने केलेले सहा गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. प्रमोद यादव (२२), सूर्या मारुमुत्तू (२१, दोघेही रा. भोलानगर झोपडपट्टी, भाईंदर) अशी आरोपींची नावे आहेत तर एकजण अल्पवयीन आहे.

नयानगर पोलीस ठाणे हद्दीत २१ ते २२ जुलै या दोन दिवसांत चार दुचाकी व एक जबरी चोरीचा गुन्हा घडला होता. पोलीस वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सहायक निरीक्षक प्रणय काटे व पराग भाट यांच्या अधिपत्याखाली दोन पथके नेमली होती. चोरीच्या गुन्ह्यातील एक दुचाकी भाईंदरच्या भोलानगर झोपडपट्टी भागात आढळली.पोलिसांनी सापळा रचला असता, ती चोरीची दुचाकी घेण्यासाठी तीनजण आले, परंतु पोलिसांच्या सापळ्याची चाहूल लागल्याने, ते पळून जाऊ लागले असताना त्यांना पकडले. आरोपींकडे तपास केल्यावर, त्यांनी नयानगर पोलीस ठाणे हद्दीतून चार दुचाकी चोरल्याचे व एक चोरी केल्याचे, तसेच भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत एक मोबाइल चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरलेल्या चार दुचाकी व अन्य मुद्देमाल जप्त केला असून, सहा गुन्हे त्यांनी केल्याचे उघड झाले आहेत.