* रेल्वेसेवा वेगवान होणार
* खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून पाहणी
ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम येत्या काही तासात पूर्ण होणार आहे. त्यामुळे ठाणे पल्याडच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून अप आणि डाऊन मार्गांवर सुमारे 80 लोकल नव्याने सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. आज खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवा स्थानकाजवळ पाचव्या सहाव्या मार्गिकेचे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी मध्य रेल्वे, एमआरव्हीसीचे अधिकारी उपस्थित होते.
सर्वांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ठाणे ते दिवा दरम्यानच्या पाचव्या-सहाव्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होते आहे. सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत हे काम पूर्ण झालेले असेल. 2007-2008 या वर्षात या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. मात्र 2015 नंतरच या कामाला गती मिळाली. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गेल्या सात वर्षांपासून या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आग्रही होती. त्यासाठी त्यांनी प्रत्येक टप्प्यावर कामाची पाहणी आणि पाठपुरावा केला होता. मध्य रेल्वे, एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका-पाहणी त्यांनी केली होती. शनिवारपासून या कामाच्या अखेरच्या टप्प्याला सुरुवात झाली. रविवारी खा. डॉ. शिंदे यांनी दिवा स्थानकाजवळ जा कामाची पाहणी केली. यानंतर बोलताना खा. डॉ. शिंदे यांनी कामावर समाधान व्यक्त केले. ‘गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे आणि दिव्या दरम्यान हे काम सुरू होते. एकूण 625 कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज पूर्ण होतो आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे पल्याडच्या रेल्वे प्रवाशांना प्रवास सुखकर होणार असून प्रवाशांना अधिकच्या लोकल मिळणार आहेत, असे डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. ‘यापूर्वी मार्गिका कमी असल्याने लोकल आणि एक्सप्रेस एकाच मार्गिकेवर येत होत्या. परिणामी उशीर होणे, गाड्यांचा खोळंबा होणे असे प्रकार होत होते. आता लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला ते कल्याणपर्यंत एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास विनाथांबा होणार आहे. स्वतंत्र सहा मार्ग उपलब्ध झाल्याने लोकल, एक्सप्रेस आणि मालगाड्या स्वतंत्र मार्गिकांवर धावतील. या कामामुळे अप आणि डाऊन मार्गांवर सुमारे 80 लोकल सुरू होऊ शकणार आहेत, अशी माहिती डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. यामुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार असून प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळेल, असेही डॉ. शिंदे म्हणाले.
दिवा स्थानकात सुविधा देण्याबाबत बोलताना, ‘रेल्वे वरील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच येथील फाटक बंद होईल. पादचारी पुलावर भार वाढेल. याचा विचार करून पादचारी पुलांच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले जाते, असेही खासदार डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. कोकण रेल्वे कडे जाणाऱ्या स्थानकांच्या कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न सुरू आहेत. दिवा स्थानकात अतिरिक्त सुविधा देण्याबाबत रेल्वेचे अधिकारी विषयी चर्चा झाली. लवकरच विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेऊ असेही डॉ. शिंदे म्हणाले. येथील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहोत असेही आश्वासन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिले.