आज अंबरनाथसह बदलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार

अंबरनाथ : रविवार आणि सोमवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे उल्हास नदीवर असलेल्या अंबरनाथसह बदलापूर शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर परिणाम झाला आहे. येथील केंद्रातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी उचल आणि प्रक्रिया करण्याचे काम विस्कळीत झाले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांचा मंगळवारी होणारा पाणी पुरवठा अनियमीत आणि कमी दाबाने होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे.

कर्जत, खोपोली आणि माथेरान या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. उल्हास नदी किनाऱ्यावर बॅरेज बंधारा आहे. या बंधाऱ्यातून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया केली जाते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून अंबरनाथसह बदलापूर शहरांना पाणी पुरवठा केला जातो.

आज सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास उल्हास नदी इशारा पातळीवरून वाहत होती. त्यामुळे धोक्याची पातळी ओलंडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली होती.
त्यामुळे शहराचा विविध सखल भागात पाणी शिरण्यास सुरूवात झाली आहे. त्याचवेळी शहरातील वीज पुरवठाही बंद झाला होता. वादळी वारे आणि पावसामुळे बॅरेज केंद्रातील वीज पुरवठा खंडीत झाला असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे पाणी उचल आणि शुद्धीकरण प्रक्रिया ठप्प झाली आहे. परिणामी अंबरनाथ आणि बदलापूर शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे उद्या मंगळवारी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने आणि अनियमीत असेल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे असलेले पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.