भाईंदर: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळून त्याखाली गाडल्या गेलेल्या कामगारांपैकी तीन महिलांच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना विरार पूर्वेला घडली आहे.
विरार पूर्वेकडील स्नेहांजली मॉलच्या मागे एका इमारतीचे सूर्यकिरण डेव्हलपर्सचे बांधकाम सुरू होते. या कामासाठी नाक्यावरून बारा कामगारांना मंगळवारी सकाळी नेण्यात आले होते. त्यात महिलांचाही समावेश होता. या कामगारांनी सोबत आणलेले जेवण घेऊन कामाला सुरुवात केली. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता त्यांची सुट्टी झाली. त्यामुळे काही कामगार वर येऊन हातपाय धुवत असताना खाली असलेल्या महिलांच्या अंगावर शेजारची सुमारे १४-१५ फुट उंच भिंत त्यांच्या अंगावर कोसळून त्यात ते गाडले गेले.
या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर आसपासच्या कामगारांनी बांधकामाखाली गाडले गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापैकी तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला आणि एक पुरुष कामगार गंभीर जखमी झाला आहे.
मयत महिलांची नांवे नंदाबाई घावणे (२८), कौसाबाई घावणे (३२), राधाबाई (३३) असून सर्वजण बीड जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. विरार पोलीस व महापालिका अग्निशमन विभाग कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नजिकच्या इस्पितळात दाखल केले आहे.