मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून चर्चेआधीच रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसने लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४१ जागांचा आढावा घेतला असून काँग्रेस नेतृत्वाने अधिकाधिक जागा लढविण्याचा मानस व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना (उबाठा) पक्षानेही लोकसभेच्या १९ जागांवर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. शनिवारी काँग्रेसच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे. काँग्रेसला मोठा जनाधार असून लोकांचा काँग्रेस पक्षावरील विश्वास आणखी वाढला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष जेव्हा जागावाटपाची चर्चा करतील तेव्हा आमच्या मागण्या मांडू तसेच भाजपाला पराभूत कसे करता येईल, याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.”
२०१९ साली जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती, तेव्हा काँग्रेसच्या वाट्याला २५ जागा आल्या होत्या. पण त्यांना केवळ चंद्रपूर या एकमात्र मतदारसंघात विजय मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसने २३ जागांवर निवडणूक लढविली आणि त्यांना चार जागांवर विजय मिळाला होता. तर शिवसेना आणि भाजप युतीमध्ये शिवसेनेने २३ पैकी १८ जागांवर विजय मिळवला होता. भाजपाने २५ जागी निवडणूक लढवून २३ जागांवर विजय मिळवला.
तथापि, जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे केवळ सहा खासदार उरले आहेत. (महाराष्ट्रातील पाच खासदार आणि एक दिव दमन) सध्याच्या घडीला महाविकास आघाडीकडे एकूण ११ खासदार आहेत. भाजपाकडे २३ खासदार आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे १३ खासदार आहेत. तसेच शिंदे-फडणवीस आघाडीला दोन अपक्ष खासदारांचाही पाठिंबा आहे.