ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी खड्डे समस्या कायम

मनसेच्या अविनाश जाधव यांचा खड्डे कोंडीवर संताप

ठाणे : गेले तीन दिवस ठाण्यात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे सर्वच ठाणेकर त्रस्त आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येमुळे नागरिकांना दीड-दोन तास कोंडीत अडकून पडावे लागत आहे. ही दरवर्षीचीच समस्या आहे. त्यामुळे, मुख्यमंत्रीच काय ठाण्याला पंतप्रधानपद जरी दिले तरी येथील समस्या कायम राहतील, असा संताप मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.

संपूर्ण जून महिना कोरडा गेला आणि ३० जूनपासून बरसणाऱ्या पावसाने प्रशासनाच्या नियोजनाचे पितळ उघडे पाडले. गेले तीन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पूर्वद्रुतगती महामार्गासह मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर तसेच, ठाणे-माजीवडा जंक्शन – घोडबंदर रोड -कल्याण नाशिक मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीचा फटका शुक्रवारी दुपारी पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर निघालेल्या मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनाही बसला. ठाणे मनपा मुख्यालयाजवळुन वसईकडे जाण्यासाठी निघालेले जाधव तब्बल अर्धातास व्हीवियाना मॉल जवळच अडकून पडले. त्यामुळे संतप्त होत त्यांनी प्रशासनासह सरकारवर ताशेरे ओढले. या वाहतुक कोंडीचा फटका शहरातील रुग्णवाहिका, शाळेच्या वाहनांना बसत असुन तासनतास वाहने कोंडीमध्ये अडकून पडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व्हिस रोडवर देखील वाहतूक कोंडी झाली होती.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर संबधित प्राधिकरणाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. मात्र या वाहतूक कोंडीचा फटका सकाळ, दुपार आणि सायंकाळी कामावर जाणाऱ्या व परतणाऱ्या नागरिकांना बसत आहे. घोडबंदर परिसरात राहणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थ्याना आणि रुग्णवाहिकाना देखील तासन तास अडकून पडावे लागत आहे. खड्डे बुजवण्यात तसेच वाहतूक कोंडी दूर करण्यात वाहतूक विभाग आणि प्रशासन कमी पडत आहे.असा आरोप करून मनसेचे ठाणे व पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी चौफेर टीका केली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाचे आगमन यंदा उशिरा झाल्याने या कालावधीत उत्तम नियोजन केले गेले नाही, हे आपले दुर्भाग्य आहे. ठाण्यात कितीतरी आमदार आहेत, त्यां आमदारांना मंत्रीपदे दिली तरी सुद्धा समस्या अजून सुटली नाही. सर्वसामान्य नागरीक कर भरतो, त्याचाही विचार केला जात नाही. तेव्हा, मुख्यमंत्रीच काय तर ठाण्याला पंतप्रधान दिले तरी ही समस्या तशीच राहणार आहे. ठाणेकरांमध्ये जागरूकता यायला हवी. तरच सुधारणा होतील अन्यथा या समस्या कायम राहतील. तेव्हा, यापुढे मतदान करताना विचार करा …असे आवाहन मनसे नेते अविनाश जाधव यांनी जनतेला केले आहे.