‘त्या’ १५ हजार वीजचोरांमुळे तीन लाख ग्राहकांवर पडतोय भार

ठाणे : कळवा-मुंब्रा-शीळ परिसरात टोरंट पॉवर कंपनीने वीज चोरांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केल्यापासून या परिसरात मागील दोन वर्षात वीज चोरीत घट झाल्याचे दिसून आले आहे. ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजनासारख्या योजनांची सुरूवात करूनही अद्याप १५ हजारावर घरे मीटरशिवाय बेकायदेशीरपणे वीज वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कळवा-मुंब्रा-शीळ परिसरात सव्वा तीन लाखावर वीज ग्राहक असून मार्च २०२० साली जेव्हा टोरंट पॉवरने फ्रँचाईझी म्हणून या भागाचा कारभार हाती घेतला तेव्हा या क्षेत्रातील वीज गळती व नुकसानीचे प्रमाण ५० टक्केपेक्षा जास्त होते. टोरंट कंपनीने केलेल्या उपायांमुळे गळती थोडी कमी झाली असली तरी, अजुनही काही प्रमाणात राहिलेली आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि अखंडीत वीज पुरवठा मिळावा यासाठी टोरंट पॉवर कंपनीने सातत्याने प्रयत्न केले. नवीन उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांचे जाळे परिसरात पसरवले. ग्राहकांना वीज वापराची अचूक नोंद दाखवणारे नवीन मीटर बसवण्यात आले. नवीन रोहीत्र, आरएमयु बसवण्यात आले. यामुळे ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा होऊ लागला. ज्यांचे मीटर महावितरणच्या काळात पीडी (कायमस्वरूपी बंद) झालेले आहेत, अशा ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजनेच्या माध्यमातून शेकडो ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून त्यांचा वीज पुरवठा सुरळित करून घेतला.

असे असतानाही काही ग्राहक अद्यापही वीज बेकायदेशीररीत्या मीटर न लावता वापरत असल्याचे आढळून आले आहे. असे करणे म्हणजे वीज चोरी असून हा कायद्याने गुन्हा आहे. वीज कायदा १३५ व १३८ अंतर्गत वीज चोरीबद्दल कायदेशीर कारवाई होऊन दंड व अटक देखील होते. टोरंट पॉवरच्या भरारी पथकाद्वारे अनेक ठिकाणी धाड घालून वीज चोरी करण्यांवर कायदेशीर कारवाई केली. असे असूनही १५ हजार घरे आजमितीस मीटरशिवाय वीज वापरत आहेत. या गैरकायदेशीर वापरामुळे नियमित वीज बिल भऱणा करीत असलेल्या ग्राहकांवर अन्याय होत आहे. वीज चोरी करणारे अनधिकृतपणे वीज केबलमध्ये, मीटरमध्ये छेडछाड करत असल्याने वीज पुरवठामध्ये व्यत्यय येतो. वीज चोरी करताना अपघात होऊन जीवही दगावू शकतो. कळवा-मुंब्रा-दिवा परिसरातील जागरूक ग्राहकानी वीज चोरी बाबत ग्राहक कक्षाशी हेल्पलाईन १८०० २६७ ७०९९ किंवा ०२५२२-२४१९०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.