ठाणे पूर्वेची वाढीव पाण्याची वाट मोकळी

जलवाहिन्यांची कामे पूर्ण

ठाणे : जुन्या आणि नवीन जलवाहिन्यांची जोडणी पूर्ण झाल्याने ठाणे पूर्व विभागाला मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या जादा सहा एमएलडी पाण्याची वाट मोकळी झाली आहे.

ठाणे पूर्व भागाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असूनकोपरी विभागात पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. महापालिकेला मिळणाऱ्या एकूण ४८५ एमएलडी पाण्यापैकी ठाणे पूर्व, कोपरी आणि आनंद नगर भागाला २२ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तरीही कोपरीतील काही भागात अपुरे पाणी मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. आनंद नगर, गांधी नगर केदारेश्वर नगर या भागात पाणी समस्या वाढली आहे. हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ठाणे महापलिका प्रशासनाने मुंबई पालिकेकडे अतिरिक्त पाणी मिळावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार सहा एमएलडी पाणी हे कोपरी विभागाला मिळाले आहे. मात्र हे वाढीव पाणी अद्याप कोपरीकरांना मिळू शकलेले नाही. ही समस्या येत्या दोन ते तीन दिवसांत सुटणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

काही भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. तो नेमका कशामुळे होत आहे, याची पाहणी नुकतीच करण्यात आली आहे. त्यात जुन्या आणि नवीन जलवाहीन्या जोडणीची कामे अर्धवट असल्याचे निदर्शनास आले असून ती कामे आता पालिकेने हाती घेतली आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत सुरु होईल, असा दावा करण्यात आला आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल. जुन्या जलवाहिन्यांची कामे तसेच जलवाहिन्या जोडण्याची कामे करण्यात आली नव्हती म्हणून काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. मात्र आता ही अडचण दूर करण्यात आली आहे, अशी माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे.