पंतप्रधानांनी ठाणे जिल्ह्यातील अनाथ बालकांशी साधला संवाद

३० मुलांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते साहित्याचे वाटप

ठाणे : पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत महत्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सुमारे ३० अनाथ बालके यावेळी उपस्थित होते. त्यांना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार कुमार आयलानी, ठाणे जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, स्माईल फाऊंडेशनच्या उमा आहुजा आदी उपस्थित होते.

तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. पुस्तक हे तुमचे मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वत:वर विश्वास ठेवा. फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जा. योगासनांना आपल्या जीवनात एक महत्वाच स्थान द्या, असा संदेश पंतप्रधानांनी यावेळी बालकांना उद्देशून दिला.

कोरोनामुळे ठाणे जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या मुला-मुलींची संख्या सुमारे ४३ आहे. त्यातील ३० जण आज उपस्थित होते त्यांना आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. उर्वरित बालकांच्या सांभाळकर्त्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी यावेळी बालकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर देत चांगला अभ्यास करा आणि उत्तम करिअर करा, असा सल्ला दिला. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंद होत्या मात्र शिक्षण ऑनलाईन सुरू होते आता जूनपासून नविन शैक्षणीक वर्ष सुरू होईल आणि शाळाही प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे चांगले नागरिक बनण्यासाठी शिक्षणाची कास धरा. समाज आपल्या सोबत आहे. तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही आहोत, असा दिलासाही श्री. नार्वेकर यांनी दिला.