ऑक्सिजन प्लांटने घेतली विश्रांती

ठाण्यात कोरोनाच्या रुग्णशय्या रिकाम्या

ठाणे : ठाणे महापालिकेने उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटचे काम अखेर थंडावले आहे. जोखमीच्या रुग्णांची संख्या नगण्य झाल्यामुळे आणि सर्व ऑक्सिजन रुग्णसहाय्य रिकाम्या असल्याने प्लांटमधून ऑक्सिजन निर्मितीची गरज तूर्त संपली आहे.

कोरोनाची दुसरी लाट मोठी असल्याने ठाणे महापालिकेने रुग्णांना दिलासा देण्यासाठी स्वतःचे दोन ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. एमएमआरडीएच्या मदतीने दिवसाला सुमारे तीन टन ऑक्सिजनची निर्मिती करणारा राज्यातील पहिला प्रकल्प महापालिकेने पार्किंग प्लाझा येथे उभारला. हवेतील ऑक्सिजन विशिष्ट पद्धतीने टाकीमध्ये साठवून त्यातील अशुद्ध घटक वेगळे करून ९३ टक्के शुद्ध प्राणवायू या प्रकल्पातून मिळतो.
पार्किंग प्लाझा डेडीकेट कोविड सेंटरमधील या दोन प्रकल्पांच्या एका ऑक्सीजन जनरेशन प्लान्टद्वारे ८५० लीटर प्रती मिनिट इतका ऑक्सीजन प्राप्त करण्याची क्षमता आहे. ३०० बेड्ससाठी ३५० जम्बो ऑक्सीजन सिलेंडर निर्माण करणाऱ्या या प्लांटमधून पाईपच्या सहाय्याने रुग्णांना प्राणवायू पुरवता येतो.

आता तिसरी लाट संपुष्टात आल्यानंतर या प्रकल्पाची गरज भासत नसल्याचे समोर आले आहे. ग्लोबल कोव्हिड रुग्णालय बंद केल्यानंतर येथील ऑक्सिजन प्लांटही बंद अवस्थेत आहे. तर पार्किंग प्लाझामध्येही एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके रुग्ण दाखल आहेत. त्यातही जोखमीचे रुग्ण एखाद दुसरे असल्याने ऑक्सिजनची गरज भासत नसल्याचे दिसून आले आहे.

सध्या प्राणवायूची गरज भासत नसली तरी प्लांट सुरूच राहणार आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे संपले असल्याचे अजून अधिकृत जाहिर झालेले नाही. त्यामुळे भविष्यात पुन्हा गरज भासल्यास ऑक्सिजन प्लांट सज्ज ठेवण्यात येत आहेत. तसेच आता गरज नाही म्हणून प्लांट पूर्णपणे बंद केल्यास पुन्हा तो सुरू करताना यांत्रिक बिघाड येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पार्विंâग प्लाझा येथील दोन्ही प्रकल्प दोन दिवसांतून काही तासांसाठी सुरू ठेवले जात असल्याची माहिती ठाणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी यांनी दिली.

ठाण्यात नवीन एक रुग्ण

रविवारी शहरात फक्त एका नवीन रुग्णाची भर पडली आहे तर तीन जण कोरोनामुक्त झाले. संपूर्ण ठाण्यात अवघे २८ जण सक्रिय रूग्ण आहेत. सुदैवाने आज पुन्हा एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

महापालिका हद्दीत माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात एक नवीन रूग्ण वाढला आहे. अन्य आठ प्रभाग समिती परिसरात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी तीन जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,४८६ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी केवळ २८जणांवर उपचार सुरु आहेत. आज कोणीही दगावला नसून आत्तापर्यंत २,१२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ३७४ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये एक जण बाधित मिळाला. आत्तापर्यंत २३ लाख ९५,४६५ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,६४१जण बाधित सापडले आहेत.