ठाणे : दागिने चोरी करून पळून जाणा-या आरोपीला गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासांत अटक करून १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्याची उत्कृष्ट कामगिरी नौपाडा पोलिसांनी बजावली आहे.
9 जानेवारी रोजी फिर्यादी आणि त्यांची पत्नी सकाळी 11:15 वाजताच्या सुमारास नौपाड्यातील आयसीआयसीआय बँक नौपाडा येथे सुमारे आठ लाख 8 हजार रुपये किंमतीचे दागिने बँक लॉकरमध्ये ठेवण्यासाठी रिक्षातून आले आणि रिक्षातून उतरल्यानंतर त्यांच्या दागिन्यांची बॅग ते घेण्याआधीच रिक्षा चालकाने दागिने असलेली बॅगचोरी करून पळून गेला.
याबाबत फिर्यादींच्या तक्रारीवरून ९ जानेवारी २३ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी चालक ज्या दिशेला रिक्षेतून जात असल्याचे दिसले होते, त्या दिशेला तीन तपास पथके तयार करण्यात आली व सुमारे 35 ठिकाणांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.
तांत्रिक तपासाच्या आधारे रिक्षाचा व आरोपी शिवप्रसाद बनवारीलाल गुप्ता याला (३७) गणपती मंदिराच्या बाजूला असलेल्या पहिली गल्ली लोकमान्यपाडाहून गुन्हा नोंद झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच पकडले आणि त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल व रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.
त्याच्याकडून आठ लाख 8 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि दीड लाख रुपये किंमतीची एक रीक्षा असा 9 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त गणेश गावडे, सहाय्यक आयुक्त सोनाली ढोले(नौपाडा विभाग) आणि वरिष्ठ निरीक्षक संजय धुमाळ, निरीक्षक आनंद निकम (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पथकाचे सहाय्यक निरीक्षक जयदीप गोसावी, उपनिरीक्षक विनोद लभडे, सर्वश्री हवालदार राजेंद्र गायकवाड, साहेबराव पाटील, संजय चव्हाण, सुनील राठोड आणि सचिन रांजणे, कॉन्स्टेबल गोरखनाथ राठोड व जयेश येळवे यांनी ही उत्कृष्ट कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बजावली आहे.