ठाणे : ठाण्यात मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडे भागात रविवारी सकाळी एका भरधाव कारची पथदिव्याला धडक बसली. या घटनेत कारमधील चार तरुण जखमी झाले आहेत.
इजलाल खान (१८) , असद खान (१७), ताहीर खान (२१) अरहम खान (१८) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अरहम हा ठाण्यातील हाजुरी येथून त्याच्या कारने नाशिकच्या दिशेने जात होता. त्यावेळी त्याच्यासोबत असद, ताहीर आणि इजलाल हे तिघे होते. कार माजिवडे परिसरात आली असता अरहमचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार येथील एका पथदिव्याला धडकली. या घटनेत चौघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही कार भरधाव होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.