राज्यात लवकरच पालिका निवडणुकांचं बिगुल; महापालिकांची अंतिम प्रभाग रचना 17मे रोजी जाहीर होणार

मुंबई: ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला 15 दिवसांत निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.  सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर निवडणूक आयोगाच्या कामाला वेग आला आहे. महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार आहे.

कोरानाचं महासंकट आणि नंतर ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा झटका यामुळे लांबलेल्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आता आणखी लांबवता येणार नाहीत. महानगपालिकेच्या निवडणुका आता तातडीनं घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळेच  महापालिका निवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे महत्वाचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या सर्व सूचनांचा सखोल अभ्यास करून 14 महापालिकांच्या प्रभाग रचना अंतिम केल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

  • * 11 मे अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण
    * 12 मे पर्यंत प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यता पाठवावी
    * 17 मे अंतिम प्रभाग रचना अंतिम प्रसिद्ध करावी
    *  17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना यादी शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, सोलापूर, नाशिक , पिपंरी चिंचवड, कल्याण-डोंबिवली महापालिकांना हे पत्र पाठवले आहे. महानगरपालिका निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ज्या महापालिकांना सहा महिने किंवा एक वर्ष झालं आहे त्यांची निवडणुक घेतली जाणार आहे. नुकतीच मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणूक दुस-या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. एकत्रित निवडणूक आल्यानं निवडणुक आयोगावर तसेच शासकीय यंत्रणेवर ताण पडू शकतो त्यामुळे अशी रणनीती आखण्याचं काम सुरु आहे.