महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेत 12 पदकांची कमाई
ठाणे : सुमारे 23 वर्षांनी नागपूर येथे होत असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेत 35 पैकी 12 पदके आपल्या नावे करीत ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंनी वर्चस्व दाखवून दिले.
१ जानेवारी ते ६ जानेवारी या कालावधी दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टीम चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या पुरुष संघाने रौप्य पदकाची कमाई केली. नागपूरच्या बलाढ्य संघाचा पराभव करीत ठाणेकर खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारली, परंतु अंतिम फेरीच्या चुरशीच्या लढतीत २-२ अशी बरोबरी असताना एकेरीच्या सामन्यात ठाणे संघाला पुण्याकडून हार स्वीकारावी लागली. ठाण्याच्या महिला संघाने देखील दमदार खेळाचे प्रदर्शन केले. उपांत्य फेरीपर्यंत सर्व सामन्यांमध्ये ठाणेकर महिलांनी प्रभुत्व राखले, परंतु उपांत्य फेरीत पुण्याच्या संघाकडून अतिशय चुरशीच्या सामन्यात त्यांना हार स्वीकारावी लागली आणि ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले. या संघाचे मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ प्रशिक्षक व छत्रपती पुरस्कार विजेते मयूर घाटणेकर यांनी उत्तम कामगिरी बजावली.
वैयक्तिक पातळीवरील खेळांमध्ये अनेक रोमहर्षक सामने पहावयास मिळाले. त्यात दुहेरीच्या तीनही गटांत ठाणेकरांनी पदकप्राप्त कामगिरी करण्याची लीलया केली आहे. त्यापैकी दोन गटांत ठाणेकर बॅडमिंटनपटूंनी सुवर्णपदक पटकावले आहे. दुहेरी मिश्र गटात प्रतिक रानडे आणि महेक नायक या नवनिर्वाचित जोडीने सर्वांनाच आपल्या खेळीने आश्चर्यचकित करून सुवर्णपदक प्राप्त केले. तर पुरुष दुहेरी गटात कूवाळे बंधूंनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
गतवर्षी अनेक राज्यस्तरीय स्पर्धा विराज आणि वीप्लव कुवाळे यांनी जिंकल्या होत्या आणि या मानाच्या ऑलिंपिक स्पर्धेत दुहेरीचे अजिंक्यपद प्राप्त करून त्यांनी आपली विजयी धुरा कायम ठेवली आहे. याच गटात उपविजेते ठरले ठाणेकर कबीर कंझारकर आणि नुकताच ऑल इंडिया सिनियर रँकिंग स्पर्धेत सुर्णपदक मिळवणारा ठाणेकर खेळाडू दीप रांभिया! दुहेरी पुरुषांच्या गटात अंतिम सामन्यात ह्या दोन्ही जोड्यांनी चुरशीची लढत दिली परंतु यात दीप आणि कबीरला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तसेच महिला दुहेरी मध्ये गतवर्षात अनेक राज्यस्तरीय स्पर्धेत अव्वल ठरलेल्या अनघा करंदीकरने रौप्य पदकाची कमाई केली आहे. सांघिक स्पर्धेत देखील उत्तम खेळाचे सादरीकरण करणाऱ्या यश सुर्यवंशी याने वैयक्तिक गटात पुरुष एकेरीमध्ये देखील दमदार खेळाचे सादरीकरण करून बलाढ्य खेळाडूंना नमवून ब्राँझ पदकाची कमाई केली आहे. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच एकत्र खेळणाऱ्या इशिता कोरगावकर आणि मानसी कारेकर यांनी देखील महिला दुहेरीत ब्राँझ पदक जिंकले आहे. अशा प्रकारे ३५ पैकी १२ पदकांवर आपले नाव कोरून ठाणेकर खेळाडूंनी ठाणे जिल्ह्याचे तसेच ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे.
या भरघोस विजयाबद्दल ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, अक्षय देवलकर व मयूर घाटणेकर तसेच क्रीडा अधिकारी मिनल पालांडे आणि ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या संपूर्ण टीमने त्यांचे अभिनंदन केले आहे.