ठाणे: केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाद्वारे संपूर्ण भारतात आयोजित केलेल्या स्वच्छ वायु सर्वेक्षण स्पर्धेत ठाणे शहराने देशपातळीवर ३ रा क्रमांक पटकावला आहे.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी निवडण्यात आलेल्या १३१ शहरांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांतून ठाणे शहराने देशात ३ रा क्रमांक पटकावला. भोपाळ येथे झालेल्या कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मा. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रोख रक्क्म 50 लाख आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
शहरांतील घनकचरा व्यवस्थापन, रस्ते बांधणी, ई-बस सुविधा, बांधकाम व विनाशक कचरा व्यवस्थापन, औद्योगिक प्रदूषण, शहरांतील पीयुसी सुविधा व पीयुसी तपासणी, रस्त्यांच्या कडेला व दुभाजकांवर वृक्ष लागवड, ई-वाहन चार्जिग सुविधा, शहरातील एकूण वाहनांच्या तुलनेत ई-वाहनांचे प्रमाण, सीएनजी व पेट्रोल पंपांची संख्या, जनजागृतीचे उपक्रम, इत्यादी घटकांच्या कसोटीवर स्वच्छ वायु सर्वेक्षण स्पर्धेत मुल्यांकन करण्यात आले.
शहराची क्रमवारी ही वेगवेगळ्या डोमेनमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरांनी केलेल्या कृतींचे मूल्यांकन करुन करण्यात आली. यात एकूण २०० गुणांपैकी १८५.२ गुण मिळवून ठाणे शहराने देशात ३रा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत मध्यप्रदेशातील इंदोर शहराने १८७ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला असून उत्तर प्रदेशातील आग्रा शहराने १८६ गुण प्राप्त करुन दुस-या क्रमांकाचा मान मिळवला आहे.
चालू वर्षामध्ये शहरामध्ये मियावाकी पध्दतीने वृक्षलागवड करण्यावर भर देण्यात आला. तसेच यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाई, एकूण रस्त्यांपैकी काँक्रिट आणि मास्टिक रस्त्यांच्या प्रमाणामध्ये झालेली वाढ त्यामुळे धुळीचे प्रदुषण कमी होण्यासाठी निर्माण झालेली अनुकूल परिस्थितती, शहरामध्ये मोठ्या संख्येने येत असणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस आणि राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमातंर्गत प्राप्त निधीचा कालबद्ध व गुणवत्तापूर्ण विनियोग या बाबींमुळे ठाणे शहराला हा बहुमान प्राप्त झाला. या माध्यमातून भविष्यामध्ये शहरातील सर्वच स्मशानभूमींमध्ये गॅस आधारित शवदाहिनी निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. तसेच पी.एम ई बससेवा कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाणे परिवहन उपक्रमाकडील इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे, अशा प्रकारे ठाणेकरांसाठी अधिक आरोग्यदायी वातावरणनिर्मितीमध्ये नक्की हातभार लागेल असे आयुक्त् अभिजीत बांगर यांनी नमूद केले.