ठाणे : गेल्या काही वर्षांपासून कागदावर असलेल्या ठाणे महापालिकेच्या फेरीवाला धोरणाला अखेर मुहूर्त मिळणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत फेरीवाला समितीच्या निवडणुकीची दिशा निश्चित करण्यात आली असून येत्या दोन ते तीन दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यानंतर एप्रिल महिन्यात फेरीवाला धोरण जवळपास निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, यामुळे बेकायदा फेरीवाल्यांना चाप लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ठाणे महापालिका हद्दीत रस्त्यावर बसणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालिकेकडून अशा फेरीवाल्यांवर कारवाई केली जात असली तरी देखील फेरीवाल्यांची संख्या कमी होतांना दिसत आहे. २०१९ मध्ये प्रशासनाने सर्वेक्षण करून शहरात सहा हजार फेरीवाले असल्याचे जाहीर केले. यामध्ये केवळ दोन हजार फेरीवाल्यांनी आपले पुरावे प्रशासनाकडे जमा केले असल्याचा दावा प्रशासनाने केला. दरम्यान आता फेरीवाला धोरण अंतिम करतांना फेरीवाल्यांची संख्या १३६५ एवढी निश्चित झाली आहे. सध्या ३० जणांची कमिटी फेरीवाल्यांची आहे. मात्र आता नव्याने कमिटी तयार होणार असून त्यात २० जणांचा समावेश असणार आहे.
आता नव्याने पुन्हा फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण केले जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. त्यामुळे आधीच्या तुलनेत फेरीवाल्यांची संख्या वाढणार असल्याचेच यावरुन दिसत आहे. तसेच जागांचा देखील नव्याने सर्व्हे केला जाणार असून त्यानुसार फेरीवाल्यांच्या जागा देखील निश्चित केल्या जातील, अशी माहिती देखील महापालिकेने दिली.