ठाणे : येत्या नऊ आणि 10 फेब्रुवारी रोजी ‘सुकन्या समृद्धी’ खाते उघडण्याची मोहिम ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत संपूर्ण देशभरात नऊ आणि 10 फेब्रुवारी 2023 या दोन दिवसात राबविण्यात येणार आहे.
ठाणे पोस्टल विभागामार्फतही या दोन दिवशी सुकन्या खाते उघडण्याचा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तरी पालकांनी या दोन दिवसात नजीकच्या टपाल कार्यालयाला भेट देऊन या योजनेचा लाभ देऊन आपल्या सुकन्येचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन ठाणे टपाल विभागाने केले आहे.
ही योजना दहा वर्षे वयाच्या आतील मुलींच्या उज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी भारत सरकारने राबविलेली योजना आहे. ही योजना ‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहिमेचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आली आहे. केवळ 250 रुपये भरून हे खाते टपाल कार्यालयामध्ये उघडता येते आणि खात्याची परिपक्वता खाते उघडल्यापासून 21 वर्षांनी होते.
खातेदार प्रत्येक वर्षी किमान 250 आणि कमाल दीड लाख रुपये इतके या खात्यात जमा करू शकतात आणि मुलीच्या 18 व्या वर्षी तिच्या शिक्षणासाठी जमा रकमेच्या अर्धी रक्कम काढता येऊ शकते. या योजनेचा व्याजदर सध्या 7.6% इतका आकर्षक आहे, अशी माहिती ठाणे टपाल विभागाच्या अधिका-यांनी दिली.