मविआत मुंबईतील आणखी एका जागेवरून संघर्ष?

वर्षा गायकवाड मैदानात उतरण्याची शक्यता

मुंबई : महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांमध्ये काही जागांवरून संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. सांगली लोकसभा मतदारसंघावरून या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता मुंबईतील एका जागेवरूनही वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणे पसंत केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढवणार, याबाबतचा सस्पेन्स आहे. असे असतानाच निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वर्षा गायकवाड यांना अनुकूल स्थिती असल्याचे सांगत काँग्रेस हायकमांडकडून त्यांना उमेदवारी देण्याबाबत आग्रह केला जात असल्याची माहिती आहे. याबाबत एका वृत्त वाहिनीने वृत्त दिले आहे.

दरम्यान, मागील दोन टर्मपासून या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार निवडून आलेला असताना उद्धव ठाकरे ही जागा सहजासहजी काँग्रेसला सोडणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मात्र काँग्रेसकडून खरंच वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी हट्ट करण्यात आल्यास महाविकास आघाडीत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.

२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे उमेवार राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. या निवडणुकीत राहुल शेवाळे यांना चार लाख 24,913 मते पडली होती, तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना दोन लाख 72,774 मते पडली होती.