गणेशोत्सवात फुलांचा तुटवडा

मुंबई : मुसळधार पावसामुळे फुलांच्या शेतीला मोठा फटका बसला असून दादर, नवी मुंबईसह ठाणे येथील प्रमुख फुलबाजारांत फुलांची आवक कमी झाली आहे. आवक कमी झाल्यामुळे बाजारपेठांमध्ये फुलांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

शेतांमध्ये पाणी साचल्याने झेंडू, मोगरा, गुलाब, चाफा यांसारख्या फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी, गणेशोत्सवाच्या काळात फुलांची मागणी वाढणार असली तरी आवक मात्र कमी राहील, असा अंदाज फुल विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गणपतीत साधारण झेंडूचा प्रति किलो १६० ते २०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

गतवर्षी याच काळात झेंडू प्रति किलो ८० ते १०० रुपये दराने विकला जात होता. तर गुलाब, मोगऱ्याचे दरही यंदापेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी कमी होते. मात्र यंदा ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीत फुलांना पावसाचा थेट फटका बसल्याने भाव दुप्पट होणार आहेत.

सध्या चाफ्याची पाच फुले २० रुपयांना मिळत आहेत. पावसाचे प्रमाण असेच राहिले तर किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. लाल, केशरी, सफेद, गुलाबी रंगाच्या सहा गुलाबांची जुडी ८० ते ९० रुपये दराने विकण्यात येत होती. काही दिवसांनी त्यात ५० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.