कळव्यातील नगरसेवकांना ओढण्याचे डावपेच
ठाणे : ठाणे महापालिकेत एकहाती सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाची जवळीक वाढली असून कळवा प्रभाग समितीमधील नगरसेवकांना आपल्याकडे आकर्षित करण्याची खेळी खेळली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत सेना-भाजपा-राष्ट्रवादी अजित पवार यांची महायुती होणार नसल्याची उघड चर्चा भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. भाजपाला महापालिकेवर एकहाती सत्ता पाहिजे असून त्यांना त्यांचा महापौर या महापालिकेत विराजमान करायचा असल्याने भाजपा इतर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या कळपात घेत असून त्यांनी नवीन एक लाख सदस्य नोंदणी देखिल केली आहे. त्यानुसार त्यांनी इतर पक्षातील नगरसेवक फोडण्यासाठी ऑपरेशन कमळ ठाण्यात सुरु केले आहे. त्यानुसार त्यांनी आज माजी नगरसेविकेला पक्षात घेऊन इरादा स्पष्ट केला आहे.
महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाला राष्ट्रवादी शरद पवार गटाची आवश्यकता लागणार आहे. कळवा मुंब्रा या दोन प्रभाग समित्यांमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे. राष्ट्रवादीच्या ३५ माजी नगरसेवकांपैकी ३१ नगरसेवक या भागातील असून एकट्या कळव्यात राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे नेते आ. डॉ जितेंद्र आव्हाड हे या भागाचे नेतृत्व करत असून या भागात त्यांचे राजकीय वर्चस्व असून त्याला सुरुंग लावून भाजपा आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याने शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादीचे आमदार डॉ. आव्हाड यांच्याशी जवळीक वाढवली आहे. एक महिन्यापूर्वी ठाणे महापालिकेतील विकास कामांच्या आढावा बैठकीला आ. आव्हाड यांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खा.नरेश म्हस्के यांनी आ.आव्हाड यांना देखिल बैठकीला बोलावल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेनेने आपली भूमिका देखिल मवाळ केली होती. राष्ट्रवादीचे या भागातील माजी नगरसेवक भाजपाच्या गळाला लागू नयेत याची खबरदारी देखिल शिवसेना शिंदे गट घेत असल्याची चर्चा कळवा-मुंब्रा भागात सुरु असल्याने हे दोन पक्ष भाजपाला रोखण्यासाठी छुपी युती तर करत नाहीत ना असा प्रश्न या भागातील सेना-राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना पडला आहे.