ठाणे: शीळगाव आणि महापे येथील डोंगरउतारावरून वाहून आणणाऱ्या नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याने यंदा पावसाळ्यात हा परिसर पुन्हा तुंबण्याची भीती व्यक्त होत आहे.
कायम वाहतुकीमुळे शीळफाटा परिसर सतत गजबजलेला असतो. या परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठमोठ्या टोलेजंग गृहनिर्माण इमारती निर्माण होत आहेत. या परिसरात असलेल्या मोकळ्या जागांवर चाळी, झोपड्या आणि गोडावून मालकांनी कब्जा केला आहे. परिणामी नैसर्गिक प्रवाह अडवले गेले आहेत. शिळफाटा ते भारत गियर्सपर्यंत असलेले नैसर्गिक नाले डेंब्रिज, माती आणि सिमेंटने नष्ट करण्यात आले आहेत. या ठिकाणी असलेल्या स्थानिक व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार २०१० नंतर या ठिकाणी नैसर्गिक नाले बुजवण्याचे काम सुरू झाले ते अूनही देखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
शीळ फाटा रोड वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा रस्ता आहे. पावसाळ्यात हा रस्ता पाण्याखाली गेल्यानंतर वाहतुकीचे तीन तेरा होतात. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पर्यावरण प्रेमींनी या संदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु भूमाफियांकडून त्यांना धमक्या देण्यात आल्या. महापालिकेत तक्रारी देऊन देखील त्याचा काहीच प्रभाव पडत नसल्यामुळे पाणी नेमके कुठे मुरते याचा शोध संबंधीत यंत्रणेने घेणे आवश्यक आहे. पालिका आणि संबंधित शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे यावर्षीही शीळ-डायघर परिसर पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.