खबरदारी घेऊन शाळा सुरु राहणार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: राज्यात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीमुळे चिंता वाढली पण काळजी घेऊन शाळा सुरु ठेवू, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पुन्हा एका चिंतेचा विषय बनली आहे. 15 जूनपासून शाळा सुरु होणार आहे. शाळांसाठी एसओपी जारी करण्यात येईल. शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसात घेण्यात येईल. तसेच शिक्षण विभाग शाळांकरता नवी कोविड नियमावली जारी करणार आहे.

कोरोनामुळे शाळा दीर्घ काळ बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं आहे. विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याकरता अवघे काही दिवस राहिले आहेत.  कोरोना रुग्णसंख्या देशभरात वाढत आहे.  राज्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकार शाळांबाबत कोणता  निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना  रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमिवर  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोरोनाचे रुग्ण वाढल्यास चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. कदाचित ही चौथी लाट असेल, परंतु, घाबरण्याची गरज नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आता  पुन्हा मास्क वापरण्याची वेळ आली आहे. लोकांनी बाहेर पडताना खबरदारी घ्यायची आहे, शिवाय कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी मास्कचा वापर करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.