‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा : पहिल्या विजयासाठी भारतीय संघ उत्सुक

‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करल्यानंतर आता गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या लढतीत पहिला विजय मिळवण्याच्या निर्धाराने भारतीय संघाचे खेळाडू मैदानात उतरतील.

कर्णधार सुनील छेत्रीने केलेल्या गोलमुळे भारताने सोमवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या लढतीत १-० अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर त्यांच्या एका खेळाडूला लाल कार्डही दाखवण्यात आले. तरीही बांगलादेशने भारताला १-१ असे बरोबरीत रोखले. त्यामुळे भारताच्या बचावफळीसह प्रशिक्षक इगॉर स्टिमॅक यांनाही टीकेला सामोरे जावे लागले.

आतापर्यंत सात वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाची श्रीलंकेविरुद्धची कामगिरी उत्तम आहे. त्यातच सलग दोन सामन्यांत पराभूत झाल्याने श्रीलंकेवर अधिक दडपण असेल. मालदीव नॅशनल फुटबॉल स्टेडियमवर होणाऱ्या उभय संघांतील या लढतीत छेत्रीव्यतिरिक्त गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू, मनविर सिंग, चिंग्लेनसना आणि अनिरुद्ध थापा यांच्यावर प्रामुख्याने भारताची भिस्त आहे.

ब्राझिलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या ७७ गोलच्या विक्रमाची बरोबरी साधण्यासाठी सुनील छेत्रीला अवघ्या एका गोलची आवश्यकता आहे.