शिवसेना महिला आघाडीचे ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र
ठाणे : ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे हिला झालेल्या मारहाणीनंतर मुंबईत आता तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र तिच्या जीवाला आता उध्दव ठाकरे गटातील नेते उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, राजन विचारे तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून धोका असल्याचा दावा करीत, तिला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
तीन दिवसांपूर्वी रोशनी शिंदे हिच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उध्दव ठाकरे यांचे अख्खे कुटुंब ठाण्यात येऊन गेले. तर बुधवारी तिच्यासाठी महाविकास आघाडीने ठाण्यात मोर्चा काढला होता. यातूनच आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यात आता शिवसेनेकडून करण्यात आलेल्या अजब मागणीनंतर यात आणखी भर पडणार असल्याचे चित्र आहे. रोशनी हिचा केवळ वापर करुन घेतला जात आहे. तिला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. या प्रकारावरुन हेच सिध्द होत आहे की रोशनीच्या माध्यमातून ठाकरे आणि राष्ट्रवादीचा गट सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या महिलेची प्रकृती चांगली असून केवळ तिच्या आधारे सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे तिला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.