रिक्षावर कोसळले झाड; रिक्षा चालकाने वाचवला स्वतःसह प्रवासी महिलेचा जीव 

बदलापूर: बदलापूर पूर्वेकडील मच्छीमार्केट समोर एकापाठोपाठ एक अशी तीन झाडे कोसळून पडली. तेथून जाणाऱ्या एका रिक्षावर झाडाच्या फांद्या कोसळून रिक्षा चक्काचूर झाली. परंतु रिक्षा चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रिक्षा चालक व रिक्षातील प्रवासी महिलाही थोडक्यात बचावली आहे.

आज मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास बदलापूर पूर्वेकडील मच्छीमार्केट समोरील तीन झाडांच्या मोठ्या फांद्या एकापाठोपाठ एक रस्त्यावर कोसळल्या. तरच विजवाहक तारांवर फांद्या पडल्याने विजवाहक तारा तुटून विजेचे खांबही वाकले. त्यावेळी या रस्त्यावरून जात असलेल्या एका रिक्षावर व मच्छी मार्केट परिसरात पार्क केलेल्या काही दुचाकींवर या मोठ्या फांद्या कोसळल्याने रिक्षा अक्षरशः चेपली गेली. तर अनेक दुचाकी वाहनांचेही मोठे नुकसान झाले. ज्यावेळी रिक्षावर झाडाच्या मोठ्या फांद्या कोसळल्या त्यावेळी रिक्षा चालकाने कमालीचे प्रसंगावधान दाखवत रिक्षातील प्रवासी महिलेला बाहेर काढून स्वतःही रिक्षातून उडी घेत स्वतःचा व या प्रवासी महिलेचा जीव वाचवला. सुदैवानं यात रिक्षा चालक व प्रवासी महिलेलाही दुखापत झालेली नाही. सुनील कडाळे (२७) असे या रिक्षा चालकाचे नाव असून तो कोंडेश्वर येथे राहणार आहे.

या रिक्षाचालकाने दाखवलेल्या या प्रसंगावधानाचे वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ तालुकाध्यक्ष दिलीप पवार व रिक्षा संघटनेचे अध्यक्ष देशमुख यांनी कौतुक केले असून या रिक्षा चालकाला तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. नगर परिषद प्रशासनाकडे धोकादायक झाडे तोडण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप दिलीप पवार यांनी केला.

झाडे कोसळल्याबाबत माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोहचण्यास अग्निशमन दलाला सुमारे अर्धा तास लागला. त्यातही अवघ्या तीन ते कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाची गाडी आल्याचे उपस्थितांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेत कटर व कोयत्याच्या सहाय्याने झाडांच्या फांद्या बाजूला केल्या. मात्र अग्निशमन दलात असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा यानिमित्ताने ऐरणीवर आला मत आहे.

बदलापूर पूर्वेकडील मच्छी मार्केट समोरच्या रस्त्यावरुन हटविण्यात आलेल्या मासळी व इतर विक्रेत्यांनी पुन्हा ठाण मांडले आहे. सकाळी व संध्याकाळी इथे विक्रेत्यांची व ग्राहकांची गर्दी होत असते.त्यामुळे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी हा प्रकार घडला असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, मात्र सुदैवाने दुपारची वेळ असल्याने याठिकाणी गर्दी नव्हती.