नूतनीकरण झाले; टाऊन हॉलचे डम्पिंग करू नका

* ठामपाकडे हस्तांतरणानंतर संस्था-संघटनांची भीती
* सामंजस्य करार रद्द करा-आ.संजय केळकर

ठाणे: ठाणे महापालिकेच्या शेकडो वास्तू आणि रुग्णालयांची योग्य नियोजनाअभावी दैना उडाली असताना कोट्यवधी रुपये खर्चून नूतनीकरण केलेला ऐतिहासिक टाऊन हॉल जिल्हा प्रशासनाने महापालिकेकडे हस्तांतरित केला आहे. या हॉलचे पुन्हा डम्पिंग हॉल होऊ नये यासाठी हस्तांतरण रद्द करण्याची मागणी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केली आहे. या भूमिकेस ठाण्यातील अनेक सामाजिक संस्था संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या कार्यकाळात आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने टाऊन हॉलच्या नूतनीकरणास सुरुवात झाली. तत्पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हॉलचे डम्पिंग झाले होते. अनेक विभागांचे साहित्य ठेवण्याचे हे ठिकाण झाले होते. त्यामुळे ठाण्यातील सामाजिक संस्था संघटनांना याचा पुरेपूर वापर करून घेता येत नव्हता. हॉलची अंतर्गत दैना कमी होती म्हणून की काय, हॉल बाहेरील भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ कचऱ्याचे डम्पिंग, नियमित स्वच्छतेचा अभाव यामुळे परिसराला अवकळा आली होती. आमदार संजय केळकर यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून याबाबत पुढाकार घेतला. आमदार निधी आणि जिल्हा नियोजन विभाग यांच्या माध्यमातून हॉलच्या नूतनीकरणासाठी सुमारे दोन कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने आवश्यक नवीन बांधकाम, अँफी थिएटर आदी कामे पहिल्या टप्प्यात करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उदघाटन करण्यात आले.

या हॉलचे दुसऱ्या टप्प्यातील नूतनीकरण जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. नुकतेच त्याचे उदघाटन करण्यात आले. ऐतिहासिक टाऊन हॉलने कात टाकली खरी पण जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे महापालिकेशी सामंजस्य करार करून या हॉलचे हस्तांतरणही केले. या निर्णयामुळे समाजात निस्वार्थ सेवा करणाऱ्या संस्था-संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार संजय केळकर यांनी या भावना उद्घाटनावेळी जाहीरपणे मांडल्या. महापालिकेच्या मालकीच्या वास्तूंची अवस्था बिकट असल्याची वस्तुस्थिती असल्याने महापालिकेशी करण्यात आलेला सामंजस्य करार रद्द करण्यात यावा तसेच जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत जिल्हाधिकारी प्रशासनाकडे याचे व्यवस्थापन देण्यात यावे, अशी मागणी श्री.केळकर यांनी केली.

ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या अनेक वास्तू, समाज मंदिरे आहेत. मात्र पालिका प्रशासनाच्या योग्य नियोजनाअभावी त्यांची दुरवस्था झाली आहे. राजकीय कार्यकर्त्यांचे पुनर्वसन या वास्तूंमधून झाल्याने तिथे सामाजिक कार्याऐवजी व्यवसाय सुरू झाले. लाखो रुपयांचे भाडे थकलेच, शिवाय दुरुस्तीचा बोजाही महापालिकेवर पडला. या पार्श्वभूमीवर टाऊन हॉलचे हस्तांतरण महापालिकेकडे करण्यात आल्याने राजकीय कार्यकर्त्यांची संस्थाने हॉलमध्ये सुरू होऊन खऱ्या सामाजिक संस्थांना यापासून वंचित राहावे लागेल, अशी भीती आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली.