मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तांचा इशारा
भाईंदर: स्वच्छतेबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नसून विकासकाने वेळेत पूर्ण झाली नाहीत तर संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा यांनी बैठकीत दिला.
मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात. सार्वजनिक सेवा आणि स्वच्छता व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी २८ मे २०२५ रोजी पालिकेच्या मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. शहरातील स्वच्छता व्यवस्थापन, शौचालयांची दुरवस्था, अपूर्ण व रखडलेली कामे, तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतनविलंब या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहरातील अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालयांमध्ये अस्वच्छता, देखभाल अभाव आणि तक्रारींचा वाढता आलेख पाहता, आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, स्वच्छता ही नागरी सन्मानाशी संबंधित बाब आहे आणि यामध्ये कुठलीही हलगर्जीपणा सहन केली जाणार नाही. शौचालयांची नियमित स्वच्छता, देखभाल आणि नागरिकांसाठी सुलभ वापर सुनिश्चित करणे हे कंत्राटदारांचे जबाबदारीचे कार्य आहे, असे त्यांनी स्पष्टपणे अधोरेखित केले. बैठकीदरम्यान अनेक अपूर्ण आणि रखडलेल्या कामांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत आयुक्तांनी चिंता व्यक्त केली. अशा कामांना वेळेत पूर्ण करण्यात अपयश आल्यास संबंधित कंत्राटदारांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आयुक्त यांनी सांगितले.
याच अनुषंगाने, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनविलंबाबाबतही आयुक्तांनी कडक भूमिका घेतली. अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे कामात उत्साहाचा अभाव दिसून येतो, याकडे लक्ष वेधून त्यांनी कंत्राटदारांना स्पष्ट सूचना दिल्या की, येथून पुढे एकाही कर्मचाऱ्याचा पगार महिन्याच्या १० तारखेपेक्षा उशिरा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. यासंबंधी कुठलीही तक्रार मिळाल्यास संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर, उपायुक्त प्रसाद शिंगटे, शहर अभियंता दिपक खांबित, संबंधित विभाग प्रमुख आणि सर्व कंत्राटदार उपस्थित होते.