आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ठाणे: दोरजे धरणातून मिळणाऱ्या २५० एमएलडी पाण्यापैकी ओवळा-माजिवडा मतदारसंघातील ठाणे शहराकरिता २०० एमएलडी पाणी मिळावे अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये सुर्या डॅमच्या माध्यमातून मीरा-भाईंदर महानगरपालिकेला लोकसंख्येचा विचार करून २१८ एम.एल.डी. व वसई-विरार १८५ एम.एल.डी. पाणी देण्याचा निर्णय शासन स्तरावर निश्चित करण्यात आलेला आहे. सुर्या प्रकल्पातून ४०३ एम.एल.डी. पाणी मिळविण्याचा प्रकल्पाचे काम एमएमआरडीएच्या आणि एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून चालू आहे. तीन महिन्यामध्ये जून, २०२३ ला वसई-विरार ला १८५ एमएलडी तर एप्रिल, २०२४ ला मीरा-भाईंदरला २१८ एमएलडी पाणी देण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट असून त्या ठिकाणी जागेवर काम देखील चालू आहे.
एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ४०३ एमएलडीचे काम चालू असले तरी भविष्यातील पाण्याचा विचार करता ७०७ एमएलडी पाणी साठवण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. लवकरच दोरजे धरणातून २५० एमएलडी पाणी या ठिकाणी जमा होणार आहे. त्यापैकी पालघर जिल्ह्यातील सिडकोच्या प्रकल्पासाठी ५० एमएलडी पाणी हे सिडकोने मागितले असून उर्वरीत २०० एमएलडी पाण्याची मागणी सुध्दा अनेक संस्थांनी केलेली आहे. ठाणे महानगरपालिकेचा विचार केला असता दिवसेंदिवस ओवळे-माजिवडे या विधानसभा मतदारसंघामध्ये घोडबंदर रोडवर झपाट्याने वाढत असलेल्या बांधकामांमुळे लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे सातत्याने घोडबंदर रोडवर पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत असतात. त्याचबरोबर काळू व शाई धरण होण्यासाठी जास्त कालावधी लागणार असल्याने ठाणे महानगरपालिका हद्दीतील घोडबंदर रोड, टिकुजिनी वाडी, वसंत विहार, शिवाईनगर, म्हाडा वसाहत, शास्त्रीनगर, वर्तकनगर, लोकमान्यनगरमध्ये सातत्याने होत असलेल्या पाणी टंचाईवर सुर्या प्रकल्पामध्ये दोरजे धरणातील २५० एम.एल.डी. पाण्यापैकी २०० एम.एल.डी. पाणी या परिसरासाठी देण्याचे धोरण निश्चित करण्याची मागणी श्री.सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या प्रकल्पामध्ये मीरा-भाईंदर शहराकरिता पाणी आणण्यासाठी घोडबंदर रोड येथील चेना गाव येथे पाण्याची मोठी टाकी निर्माण करण्यात येत आहे. या टाकीतून मीरा-भाईंदरसाठी २१८ एमएलडी आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी २०० एमएलडी पाणी तांत्रिकदृष्ट्या वितरीत करता येऊ शकेल. फक्त त्या टाकीमधून ठाणे महापालिका हद्दीमध्ये पाणी वितरीत करण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम करावे लागत असल्यामुळे हे काम करणे महापालिकेला सोपे होईल. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसह एका बैठकीचे आयोजन करून याबाबतीत निर्णय घ्यावा, अशी मागणी श्री.सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.